नाना पटोले यांचे राष्ट्रपती, पंतप्रधान यांना पत्र

मुंबईः  मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा व लोकभाषा आहे. मराठी भाषेचे स्वतंत्र व्याकरण, लिपी व विपुल साहित्य संपदाही आहे. जगात दहावी व देशात तिसऱ्या क्रमांकाची मराठी भाषा असून मराठी भाषा बोलणाऱ्यांची संख्या १० कोटी आहे. प्राचिन शिलालेखावरही मराठी भाषेचा उल्लेख आढळतो. अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होण्यासाठी असलेल्या सर्व निकषांना मराठी भाषा पात्र ठरत असल्याने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, अशी मागणी  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रपती व पंतप्रधान यांना पत्र पाठवून केली आहे.

 

पंतप्रधान व राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रात पटोले पुढे म्हणातात की, मराठी भाषा प्राचिन भाषा असून तिसऱ्या शतकातील सातवाहन राजवटीतील घारापुरी लेण्यांमध्ये सापडलेल्या नाण्यांवर मराठीचा उल्लेख आढळतो. सहाव्या शतकात राजा हाल लिखित ‘गाथा सप्तशती’ लिहीला तर १२ व्या शतकात मुकुंदराज या कविने ‘विवेकसिंधू’ या काव्यग्रंथाची निर्मिती मराठी भाषेत केली. प्राचिन काळातील अनेक शिलालेखावरही मराठी भाषेचा उल्लेख आढळून आलेला आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तेलंगणा, गोवा, गुजरात या राज्यात तसेच अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, न्युझीलंडसह विविध देशात मराठी बोलणारे असंख्य लोक आहेत. अमेरिकेच्या २३ विद्यापिठांमध्येही मराठी भाषा शिकवली जाते. अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करण्यासाठी असेलले सर्व निकष मराठी भाषेत असल्याने याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, असे या पत्रात म्हटले आहे.

Share