नरवीर मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा रुपेरी पडद्यावर

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जाती-जमातीच्या शूर मावळ्यांना सोबत घेत हिंदवी स्वराज्य स्थापन करून जाज्वल्य इतिहास घडविला. छत्रपती शिवरायांसाठी आणि स्वराज्यासाठी शूर मावळ्यांनी जीवाची बाजी लावली. या मावळ्यांपैकीच निष्ठावंत मावळा म्हणजे मुरारबाजी देशपांडे. नरवीर मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. ‘फत्तेशिकस्त’ आणि ‘पावनखिंड’ चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आलमंड्स क्रिएशन्स व ए. ए. फिल्म्स यांनी ‘वीर मुरारबाजी…पुरंदरची युद्धगाथा’ या चित्रपटाची घोषणा केली आहे.

सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यात लढाया करणारे शूरवीर आणि पराक्रमी मावळे स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावण्यासाठी सदैव तयार असत. अशा पराक्रमी आणि निष्ठावंत मावळ्यांमध्ये रणधुरंधर नरवीर मुरारबाजी देशपांडे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. स्वराज्याच्या इतिहासात पुरंदरचे ‘काळभैरव’ म्हणून ओळख असणारे मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा ‘वीर मुरारबाजी…पुरंदरची युद्धगाथा’ या मराठी चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पुढच्या वर्षी १७ फेब्रुवारी २०२३ रोजी येण्यासाठी सज्ज होत आहे. शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून या चित्रपटाची पहिली झलक प्रदर्शित करण्यात आली आहे. या चित्रपटाची निर्मिती अजय आरेकर, अनिरुद्ध आरेकर, भाऊसाहेब आरेकर यांची आहे.

मराठी चित्रपटांना सध्या ‘अच्छे दिन’ आले आहेत. मराठीमधील ऐतिहासिक चित्रपट तर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. सध्या प्रेक्षकांचा ओढा ऐतिहासिक चित्रपटांकडे अधिक वाढला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेता प्रवीण तरडे यांच्या ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाला तर प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. ऐतिहासिक चित्रपटांना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत असताना आता आणखी एका ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे, तो चित्रपट म्हणजे ‘वीर मुरारबाजी…पुरंदरची युद्धगाथा’.

१६६५ मध्ये आषाढ महिन्यात मिर्झाराजे जयसिंग आणि सरदार दिलेरखान यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला. त्यावेळी पुरंदरचे किल्लेदार असलेले मुरारबाजी देशपांडे निवडक सातशे मावळ्यांसह दिलेरखानाच्या फौजेवर चालून गेले आणि त्यांनी ‘न भूतो न भविष्यती’ असा पराक्रम केला. यादरम्यान नेमके काय घडले? मुरारबाजी देशपांडे यांनी मुघलांशी कशा प्रकारे दोन हात केले? हे या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.

https://www.instagram.com/p/CedsH25pd6p/?utm_source=ig_web_copy_link

पुरंदरच्या लढाईतील पराक्रमाने मुघलांना भयभीत करून सोडणाऱ्या मुरारबाजी देशपांडे यांची ही यशोगाथा आजच्या पिढीला चित्रपटाच्या माध्यमातून समजावी यासाठी ‘वीर मुरारबाजी…पुरंदरची युद्धगाथा’ हा चित्रपट आम्ही घेऊन येत असल्याचे निर्माते अजय आरेकर यांनी सांगितले. जास्तीत जास्त तरुणांपर्यंत स्वराज्याचा प्रेरणादायी इतिहास पोहोचवायचा आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ‘पावनखिंड’ सारखा ‘वीर मुरारबाजी…पुरंदरची युद्धगाथा’ चित्रपटही भव्यदिव्य असेल. चित्रपटासंबंधित इतर घोषणा लवकरच करण्यात येणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन कोण करणार? तसेच चित्रपटातील कलाकार कोण असणार? याबाबत देखील लवकरच घोषणा करण्यात येणार आहे. हा ऐतिहासिक चित्रपट पुढील वर्षी १७ फेब्रुवारी २०२३ रोजी चित्रपटगृहांमध्ये दाखल होईल, अशी माहिती निर्माते अजय आरेकर यांनी दिली.

Share