राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक

मुंबई : राष्ट्रवादी काॅँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये सुरु असलेला हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला होता. यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली होती. त्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.

ठाण्यातील वर्तकनगर पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलं आहे. आज दुपारी साधारण १ वाजता मला वर्तकनंगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी माणूस पाठवतो नाहीत तुम्ही पोलीस स्टेशनला या असं ते म्हणाले. मी मुंबईला जायला मिघालो होतो. मी म्हटलं की, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो. मी पोलीस स्टेशनला गेलो असता त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं त्यानंतर डिसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळयात आणि चेहऱ्यावर अस्वस्थपणा दिसत होती. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले की मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हाला अटक करावी लागेल. असं आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

तसंच हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण जे केलेलं नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही, अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी दिली आहे. तसंच सरकारनं कट शिजवून मला ताब्यात घेतलंय. या प्रकरणी मी जामीन मागणार नाही, अशी प्रतिक्रिया आव्हाडांनी दिली.

Share