फाशी दिली तरी चालेल, गुन्हा कबूल करणार नाही; अटकेनंतर आव्हाडांचं मोठं वक्तव्य

ठाणे : राष्ट्रवादी काॅँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये सुरु असलेला हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला होता. यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली होती. त्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, या अटकेवर आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटमध्ये म्हटलं, मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेह-यावरती अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले की, मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हांला अटक करावी लागेल. हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही.असं त्यांनी म्हटलं आहे.

…तर त्यांना आयुष्यभर जेलमध्ये ठेवलं पाहिजे – मनसे नेते संदीप देशपांडे
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावरील कारवाईचं स्वागत केलं आहे. “कायदा आपलं काम करत आहे. ज्यापद्धतीने तुम्ही एका क्षेत्रात जाता, प्रेक्षकांना मारहाण करता ते चुकीचं आहे. सूडबुद्धीने कारवाई करण्याचा प्रश्नच नाही. अशी थेरं करत असतील तर त्यांना आयुष्यभर जेलमध्ये ठेवलं पाहिजे. आधीही मंत्री असताना एकाला घरी बोलावून मारहाण केली होती. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आम्ही केली होती. अविनाश जाधव तिथे गेले होते. कारवाई होतेय ही चांगली गोष्ट आहे,” अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली

 

Share