फुरसुंगी-उरुळी गावांसाठी नवीन नगरपालिका; मुख्यमंत्र्यांचा निर्णय

मुंबई : पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये सामाविष्ट फुरसुंगी आणि उरुळी देवीची या गावांची नवी नगरपालिका करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. या नगरपालिकेच्या माध्यमातून या गावांतील नागरिकांच्या नागरी सुविधांचा प्रश्न मार्गी लागेल. तसेच नागरिकांच्या सहभागातून ही नगरपालिका विकास कामांमध्ये  एक सर्वोत्कृष्ट ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गावांतील मालमत्ता कर आणि मुलभूत सोयी सुविधांबाबत बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला माजी राज्यमंत्री विजय शिवतारे,नगरविकास विभागाचे आतिरिक्त, मुख्य सचिव भूषण गगराणी, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्यासह या दोन्ही गावांतील स्थानिक नागरिक उपस्थित होते.

फुरसुंगी आणि उरुळी देवाची येथील नागरिकांनी आपली नगरपालिका राज्यातील एक सर्वोत्कृष्ट अशी नगरपालिका ठरावी यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. तसेच पुणे नगरपालिकेने या दोन्ही गावांत नागरी सुविधांशी संबंधित सुरु केलेल्या प्रकल्प, योजनामंध्ये सहकार्य देणे अपेक्षित आहे. त्यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी एकत्र काम करावं, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

दोन गावांची नगरपालिका करुन गावांच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे गावांचा विकास आणि सोयीसुविधा उपलब्ध होणार आहे. त्यासोबतच महानगरपालिकेकडून राबवण्यात येत असलेल्या कचरा व्यवस्थापन तसेच अन्य नागरी प्रकल्पांमध्येही सहकार्य दिले जाईल, असंही नागरिकांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे आणि या निर्णयासाठी नागरिकांनी आणि स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

Share