गोव्यात कुणालाही बहूमत मिळणार नाही- संजय राऊत

मुंबई- गोवा विधानसभा निवडणुकांविषयी शिवसेनेच्या एंट्रीमुळे जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. संजय राऊत आणि शिवसेनेच्या इतर अनेक नेतेमंडळींनी गोव्यात केलेल्या प्रचारानंतर गोव्यात शिवसेनेचं खातं उघडण्याचा विश्वास बोलून दाखवला होता. आज गोव्यासह उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि मणिपूरमधील मतमोजणीचे निकाल लागणार आहेत. निकालाच्या पहिल्या फेरीमध्ये गोवा आणि उत्तर प्रदेशातही शिवसेना बॅकफूटवर  असल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या मतमोजणी कलांविषयी भूमिका मांडली आहे.

पोस्टल बॅलेटवर संयमाने बोलायला हवं. २०-२० फेऱ्या होत असतात. बिहारमध्ये काय झालं हे तुम्ही पाहिलंच असेल. पंजाबमध्ये देखील अजून काही स्थिती स्पष्ट नाही. सर्व राज्यांमध्ये पूर्ण निकाल येईपर्यंत उद्याची सकाळ उजाडेल. गोव्यात माझ्यामते कुणालाही बहुमत मिळत नाहीये. खिचडी बऱ्याच ठिकाणी बनू शकते. फक्त गोव्यात नाही, असं देखील राऊतांनी यावेळी म्हंटल आहे.

दरम्यान, २०१७मध्ये बहुमत असूनही अंतर्गत समन्वयाच्या अभावामुळे गोव्यात काँग्रेसला सत्तेपासून वंचित राहावं लागलं होतं. तसा काही प्रकार यावेळी होणार नसल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत. गेल्या वेळी गोव्यात जे झालं, ते यावेळी होणार नाही. पी. चिदम्बरम तिथे बसले आहेत. आम्ही सगळे त्यांच्यासोबत आहोत. त्यांना महाराष्ट्राकडून जी काही मदत लागेल, ती आम्ही देऊ, असं राऊत म्हणाले.

 

Share