संजय राऊत यांना दिलासा नाही; राऊतांचा जेलमधला मुक्काम वाढला

मुंबई : पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ झाली आहे. राऊत यांना न्यायालयाने ५ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे सध्या संजय राऊत यांचा आर्थर रोड कारागृहातील मुक्काम वाढला आहे.

गोरेगाव पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने संजय राऊतांना १ ऑगस्टला नऊ तासांच्या चौकशीनंतर अटक केली होती. त्यानंतर २ वेळा जामीन नाकारत ईडीने त्यांची कोठडी कायम ठेवली. त्यामुळे आज पुन्हा एकदा कोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीनंतर ५ सप्टेंबरपर्यंत त्यांची कोठडी कायम ठेवण्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.

काय आहे पत्राचाळ घोटाळा?
मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचं काम देण्यात आलं होतं. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे तीन हजार फ्लॅट बांधकाम करायचं होतं, त्यापैकी ६७२ फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती. परंतु, २०१० मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे २५८ टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर २०११, २०१२ आणि २०१३मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले. पत्राचाळ जमीन घोटाळा हा १,०३४  कोटी रुपयांचा असल्याचा संशय ईडीला आहे.

Share