ग्रामपंचायत निवडणुकांसाठी ऑफलाईन अर्ज सादर करण्याची मुभा

मुंबई : राज्यातील  विविध जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने (ऑफलाईन) नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुदत २ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५.३० पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी आज दिली.

मदान यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने ९ नोव्हेंबर २०२२ रोजी राज्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार २८ नोव्हेंबर २०२२ ते २ डिसेंबर २०२२ दुपारी ३ वाजेपर्यंत या कालावधीत संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशनत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यात आता अंशत: दुरूस्ती करून नामनिर्देशनपत्र ऑफलाईन पद्धतीने २ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५.३० पर्यंत सादर करता येतील.

असा आहे निवडणूक कार्यक्रम –

अर्ज दाखल करण्याची मुदत – २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर

अर्ज छाननी – ५ डिसेंबर

अर्ज मागं घेण्याची तारीख – ७ डिसेंबर

मतदान – १८ डिसेंबर

मतमोजणी आणि निकाल – २० डिसेंबर

Share