पंडित शिवकुमार शर्मा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार : मुख्यमंत्री उद्वव ठाकरे

मुंबई : संतूर या वाद्याची जगाला ओळख करून देणारा, संतूरच्या अलौकिक तरंगांनी जगाला भुरळ घालणारा भारतीय संगीत क्षेत्राचा एक मानबिंदू  अस्ताला गेला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ संगीतकार, संतूरवादक पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे. पंडित शिवकुमार शर्मा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यविधी करण्यात येणार आहेत. त्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना निर्देश दिले आहेत.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, पंडित शर्मा आणि संतूर वाद्य यांचे अतूट असे नाते आहे. त्यांच्या नावानेच संतूरला ओळख मिळाली. तर भारतीय संगीताला संतूर मिळाले. पंडित शर्मा यांच्या संतूरच्या अलौकिक स्वरांनी केवळ भारतीयांना नाही, तर जगाला भुरळ घातली. जम्मू काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग म्हणतात, तर याच भूमीतील संतूर या एका लोकवाद्याच्या स्वर्गीय अशा तरंगांची पंडितजींनी जगाला ओळख करून दिली. जगभरात जिथे भारतीय संगीत पोहोचले आहे, तिथे संतूर पोहोचले. हे पंडित शर्मा यांच्या अखंड साधनेचे हे योगदान आहे. विनम्र स्वभावाच्या पंडित शर्मा यांनी  संगीत क्षेत्राची अखंड सेवा केली. पंडित शर्मा यांचे योगदान भारतीय संगीत क्षेत्राला कदापिही विसरता येणार नाही. शिवकुमार शर्मा हे भारतीय संगीत क्षेत्राच्या मानबिंदूपैकी एक होते. त्यांच्या निधनामुळे भारतीय संगीताचा एक मानबिंदू अस्ताला गेला आहे. पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मां यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

यासोबतच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देखील पंडित शिवकुमार शर्मा यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. पंडित शिवकुमार शर्मा यांचे आकस्मिक जाणे धक्कादायक आहे. पंडित शिवकुमार शर्मा यांनी संतूर वाद्य तसेच भारतीय शास्त्रीय संगीत आपल्या अद्भुत अदाकारीने जागतिक स्तरावर नेले. चिंतनशील असलेल्या पंडित शिवकुमार शर्मा यांनी आपल्या वादनातून शास्त्रीय संगीतात नवनवे प्रयोग यशस्वी करून दाखविले. एक महान कलाकार, श्रेष्ठ गुरु, संशोधक आणि सुहृद व्यक्ती असलेल्या शिवकुमार शर्मा यांनी अनेक उत्तम शिष्य घडवले आणि संगीत विश्व समृद्ध केले. पं. शर्मा यांना आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांचे सुपुत्र पंडित राहुल शर्मा तसेच इतर कुटुंबियांना कळवतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

Share