दूश्मनांनो याद राखा म्हणत सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर टिका

मुंबई- शिवसेना छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनूसार साजरी करते. याच पार्श्वभूमीवर आज सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने भाजपवर आपले टिकास्त्र सोडले. या अग्रलेखातून दूश्मनांनो याद राखा अशा शब्दात टिका करण्यात आली आहे.

आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे, अनेक कवी शाहीरांनी, इतिहासकारांनी आपल्या वकूबानूसार महाराजांचे वर्णन केले आहे. यात नेवाशाला राहणारा परमानंद कवी हा महाराजांचा विश्वासू होता. त्याने आपल्या ‘शिवभारत’ ग्रंथात ‘चरितं शिवराजस्य भरतस्येव भारतम्’ असे म्हटले आहे. बखरकाराप्रमाणे शंकराचा अवतार न मानता तो शिवाजीराजांना विष्णूचा अवतार म्हणतो. परमेश्वर जसा सर्वांच्या वर दहा अंगुळे उरला असे सांगतात तशीच गोष्ट शिवाजी महाराजांची आहे. त्यांची कितीही चरित्रे लिहिली तरी ‘शिवाजी महाराज’ त्या सर्व चरित्रांवर दहा बोटे शिल्लक आहेतच. महाराष्ट्राला इतिहास आहे तसा इतर प्रांतांना नाही. महाराष्ट्राला इतिहास आहे, कारण येथे शिवाजी महाराज जन्माला आले. त्यांनी औरंगजेबाच्या मस्तकावर पाय देऊन स्वराज्य स्थापन केले. औरंगशहाला स्वतःलाच दिल्लीत कोंडीन असे शिवाजी महाराजांचे वक्तव्य इंग्रजी इतिहासात सापडते, असं अग्रलेखामध्ये म्हटलं आहे.

केंद्रावर निशाणा साधत अग्रलेखात म्हंटल आहे की, महाराष्ट्र दिल्लीपुढे झुकत नाही. दिल्लीची गुलामी पत्करत नाही या विचारांची बीजे, ‘‘औरंगशहाला दिल्लीतच कोंडीन’’ या शिवरायांच्या मर्दानी बाण्यात आहेत. महाराज हे शिवप्रभू होते. सभासदी बखरीत काय वर्णन केले आहे ते पहा. कृष्णाजी अनंत सभासद यांनी रचलेली, शिवाजी महाराजांच्या देहत्यागानंतर तयार झालेली ही बखर. सभासद आपल्या बखरीत ‘राजियांचे चरित्र आख्यान’ यामध्ये ते म्हणतात, ‘‘राजा साक्षात केवळ अवतारीच. जन्मास येऊन पराक्रम केला. नर्मदापासून रामेश्वरापर्यंत द्वाही फिरली. देश काबीज केला. आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही व मोगलाई या चारी पातशाह्या व समुद्रातील बेवीस पातशहा असे जेरजप्त करून नवेच राज्य साधून मराठा पातशहा सिंहासनाधीश छत्रपती जाहला. प्रतिइच्छा मरण पावून कैलासाला गेला. ये जातीचा कोणी मागे जाहला नाही, पुढे होणार नाही,’’ असा संदर्भ लेखात देण्यात आलाय.

शिवरायांचे राज्य श्रमिकांचे होते. त्याच श्रमिकांनी लढून मुंबईसह महाराष्ट्र मिळवला. तोच श्रमिक बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट पाठीराखा बनला. महाराष्ट्र कधीच रडत बसला नाही. हीच शिवरायांची प्रेरणा. संभाजीराजांना दगलबाजीने मारल्यावर सेनापती मेला म्हणून महाराष्ट्र रडत बसला नाही. उलट सूडाने आणखी पेटून उठला, खवळून उठला. प्रत्येक शेतकरी, मराठा, मावळा लढत राहिला व संभाजी राजांना मारणाऱ्या औरंगजेबाला याच महाराष्ट्रात गाडून शांत झाला. मुजरे आणि हुजरे करणाऱ्यांत महाराष्ट्राची गणना झाली नाही, हेच खरे शिवचरित्र. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला शौर्य दिले, ते शौर्य आजही भवानी तलवारीसारखे धारदार व खणखणीत आहे. आजच्या शिवजयंतीस आम्ही महाराष्ट्राच्या दुश्मनांना त्याची जाणीव करून देत आहोत. महाराष्ट्राच्या दुश्मनांसाठी शिवचरित्र हा एक धडा आहे! या अग्रलेखातून भाजपवर टिका करण्यात आली आहे.

Share