‘कुणी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला’, फडणवीसांचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

पणजी :  राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाजपावर जोरदार टिका केली होती. भाजपाने पाठीत खंजीर खुपसला असे म्हणत आदित्य ठाकरेंनी  टोला लगावला होता. यावर आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिणीला दिलेल्या मुलाखतीमध्ये आदित्य ठाकरेंना कोणी  कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला हे महाराष्ट्रच्या जनतेला माहित आहे, असे प्रत्युत्तर दिले.

आदित्य ठाकरे म्हणाले की, आमची जेव्हा भाजपासोबत युती होती, तेव्हा बाळासाहेब ठाकरेंची ही भावना होती की मित्रपक्ष असेल, तर मैत्री स्वच्छपणे पुढे न्यायला हवी. कुठेही आपल्या मित्राला धोका निर्माण व्हायला नको. त्यांना मदत म्हणून आम्ही इतर राज्यात लढायचो नाही. गेल्या ५ वर्षांत आमच्या पाठीत खंजीर खुपसला गेला. एनडीएमधल्या इतर पक्षांच्या पाठीत देखील खंजीर खुपसला गेला , अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी भाजपावर टिका केली होती.

फडणवीस यावर म्हणाले की, महाराष्ट्रात सगळ्यांनी बघितले आहे की भाजपासोबत युतीमध्ये शिवसेना निवडून आली. भाजपाच्या स्टेजवर मोदींनी घोषणा केली भाजपाच्या मुख्यमंत्र्यांची. त्याला तुम्ही समर्थन दिले. तुमच्या सगळ्या लोकांनी मोदींचा फोटो लावून लावून मतं मागितली. त्यानंतर केवळ मुख्यमंत्रीपदासाठी तुम्ही युतीधर्म मोडला आणि विरोधकांसोबत गेले. राज्याच्या जनतेला नीट माहिती आहे की कुणी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, असे फडणवीस म्हणाले. गेल्या वेळी उत्तर प्रदेशची देखील आठवण करून दिली. राम जन्मभूमीच्या आंदोलनानंतर उत्तर प्रदेशमध्ये २०० जागा लढले होते. एका जागेवर देखील डिपॉझिट वाचवू शकले नाहीत. उलट मित्रपक्ष असूनही भाजपाला जिथे जिथे नुकसान पोहोचवता येईल तो प्रत्येक वेळी प्रयत्न शिवसेनेने केला. पण ते कधीही यशस्वी झाले नाहीत असा देखील आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला.

भाजपाचे नुकसान होऊ नये म्हणून आम्ही आजपर्यंत राज्याबाहेर इतर ठिकाणी उमेदवार उभे केले नाहीत, असा दावा आदित्य ठाकरेंनी केला होता. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले , आदित्य ठाकरेंना इतिहास माहिती नाही. याआधी भाजपा सोबत असताना पूर्ण ताकदीनिशी शिवसेना गोव्यात उतरली होती. पण गोव्याने प्रत्येक वेळी शिवसेनेला नाकारले. अशी कोणती निवडणूक आहे जिथे भाजपा लढतंय म्हणून ते लढले नाहीत? गेली २०-२५ वर्ष हे लोक लढत आहेत. पण त्यांचं डिपॉझिट कधीच वाचत नाही. इतिहास विसरून हे लोक बोलतात, महाराष्ट्रली जनतेला  माहित आहे की कोणी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला,  असे फडणवीस म्हणाले आहेत.

 

Share