समजा, वंदे मातरम् म्हटलं नाही तर गोळ्या घालणार की फासावर लटकवणार?

मुंबई : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त कालपासून राज्यात ‘हॅलो नव्हे- वंदे मातरम्’ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत आता सर्व सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फोनवर बोलण्यास सुरुवात करण्यापूर्वी हॅलो ऐवजी वंदे मातरम् म्हणावं लागणार आहे. सरकारच्या या निर्णयावर एमआयएम नेते वारिस पठाण यांनी निशाणा साधला आहे.

एमआयएम नेते वारिस पठाण म्हणाले की, भाजपजवळ काही मुद्देच शिल्लक राहिलेले नाहीत. कधी शहरांची नावं बदलायची तर कधी वंदे मातरम म्हणायला लावायचं. पण ही सगळी बेरोजगारी म्हणजे केवळ महागाईवरून लक्ष वळवण्याचे नाटकं आहेत. या निर्णयामुळे बेरोजगारी दुर होणार आहे का? महागाई कमी होणार आहे का? शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार आहेत का?

अभियानाची सुरुवात पण हे कोणत्या दिवशी करत आहेत, तर महात्मा गांधी यांच्या जयंतीदिवशी. जे महात्मा गांधी फादर ऑफ नेशन आहेत, त्यांना नथुराम गोडसेने मारले. तो देशाचा पहिला दहशतवादी होता, त्याची तर हे सगळे पुजा करतात. गोडसे मुर्दाबाद हे तर त्यांच्या तोंडून कधी येणार नाही. फक्त अशा काही तरी मुद्द्यांवर लक्ष बाजूला करायचं आणि द्वेषाचे पसरवायचा हेच यांचे राजकारण आहे, असा हल्लाबोल पठाण यांनी केला.

 

समजा जर कोणी वंदे मातरम् म्हणाले नाही तर ते काय करायचे? गोळी मारणार का? त्याच्यावर गुन्हा दाखल करणार? त्याला तुरुंगात टाकणार की त्याला फासावर लटकवणार? हेही भाजपच्या नेत्यांना सांगावे लागेल. संविधानाने वंदे मातरम म्हणायला सांगितले आहे का? असाही सवाल पठाण यांनी उपस्थित केला. बेरोजगारी, महागाईवर कोणी त्यांच्याशी बोलले तर ते चित्त्यापेक्षा वेगाने पळून जातील, असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.

Share