पावसाळ्यात अशी घ्या, आरोग्याची काळजी

पावसाला सुरूवात झाली आहे. सतत कोसळणारा पाऊस काहीसा कमी झाला आहे. पावसाळा सगळ्यांच्या आवडतीचा ऋतू असला तरी या दिवसांमध्ये अनेक आरोग्याच्या समस्या उदभवतात. त्यामुळे आज आपण अशा ऋतूत नक्की कशी काळजी घ्यायची हे पाहू. बदलत्या वातावरणाचा आपल्या शरीरावर थेट परिणाम होत असतो. त्यामुळे काही प्रमाणावर काळजी घेणे आवश्यक आहे.

पावसाच्या दुषित पाण्याने आजार पसरतात. त्याचप्रमाणे पावसाळ्यात आपली पचनक्रिया मंदावते, रोगप्रतिकारकशक्तीही कमी होते. अशा वेळेस आहाराचे योग्य नियोजन असायला हवे. पावसाळाच्या काळात डायरिया, कॉलरा, वाताचे विकार या पाण्यामुळे होणार्‍या आजारांबरोबरच सर्दी, खोकला- पडसे यासारखे आजार जडतात. दूषित पाण्यामुळे कावीळ, लेप्टोस्पायरोसिस यांसारखेही विकार जडतात.
कसा असावा आहार

  • आषाढ, श्रावण, भाद्रपद या काळात आपली पचनशक्ती कमी असते. त्यामुळे शक्यतो आहार प्रमाणापेक्षा कमीच घ्यावा.
  • पाणी उकळूनच प्यावे. त्याचप्रमाणे नॉनव्हेज शक्यतो टाळायला हवे.
  • उकडलेल्या भाज्या, पालेभाज्यांचा समावेश आहारात करू नये. फळभाज्यांवर भर द्यावा. उदा. भोपळा, दुधी. आहारात मुगाची डाळ, खिचडी, मका हे पदार्थ आरोग्यास लाभ दायक आहेत
  • मीठ आणि आंबट कमी असलेले जेवण करावे. लोणचे, चटणी, दही, अतितिखट पदार्थांचा समावेश आहारात करू नये.
  • भेळपुरी, पाणीपुरी असे उघड्यावरचे पदार्थ तर पूर्णत: बंद करावेत.
  • आहारात लसूण, आलं, मिरी, हिंग, जिरे, हळद, कोथिंबीर या पदार्थांचा समावेश अत्यंत लाभदायक ठरतो.
  • पावसाळ्यात दुपारची झोप टाळावी. कारण यामुळे शरीरात अतिरिक्त पित्त वाढण्याची शक्यता असते.
Share