दहशतवाद आणि ब्लॅकमेलिंग हा भाजपाचा मुख्य व्यवसाय – नाना पटोले

मुंबई : ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांची भीती घालण्याचा प्रकार भाजपकडून सातत्याने केला जात आहे. मागील सात-आठ वर्षातील भाजप नेत्यांची विधाने पाहिली तर विरोधाकांना घाबरवण्यासाठी, त्यांचा आवाज बंद करण्यासाठी ते कारवायांच्या धमक्या देत असतात. भाजपाचा आता दहशतवाद आणि ब्लॅकमेलिंग हा मुख्य व्यवसाय झाला आहे, पंरतू लोकशाहीत हे फार काळ टिकणार नाही. असा हल्लाबोल काॅँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर केला आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या पाहिल्या दिवशी विधिमंडळ परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोेले म्हणाले की, दहशत, भय आणि भूक या सर्व गोष्टी घेऊन केंद्रातील सत्ताधारी भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे. त्यांना कधी ना कधी त्यांची जागा पाहायला मिळणार आहे. इंग्रजांनी हुकुमशाही कारभार केला त्याला जनता धाबरली नाही आता स्वंतत्र भारताला भाजप इंग्रजांच्या पावलावर पाऊल टाकत त्याच पद्धतीने कारभार करू पहात पण ते आता शक्य नाही. महाविकास आघाडीचे सरकार पारडतानाही भाजपाकडून याच पद्धतीचा अवलंब केला. भाजपाने कारवाईच्या कितीही धमक्या दिल्या तरी महाविकास आघाडीचे नेते अशा धमक्यांना घाबरणार नाहीत, असं नाना पटोले म्हणाले.

ईडी सरकारची उलटी गिनती सुरू
विरोधी पक्ष या नात्याने आम्ही जनतेचे प्रश्न मांडत आहोत त्यावर सरकारकडे उत्तर नाही म्हणून विरोधकांचा आवाज बंद करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांच्या नावाने धमक्या देऊन विरोधाकांना घाबरवण्याचे राजकारण केले जात आहे. ईडी सरकारची उलटी गिनती सुरु झाली असून जनतेचे प्रश्न आम्ही उपस्थित करत राहू असं पटोले यावेळी म्हणाले.

शेतकऱ्यांना मदत पोहोचवा
वैनगंगा नदीच्या कोपामुळे भंडारा जिल्ह्यातील जनजीवन अस्ताव्यस्त झाले आहे. शिवारात पाणी साचल्याने धान पीक सडण्याच्या मार्गावर आहे. मोहाडी, लाखांदूर, पवनी या तालुक्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. येथे त्वरित मदतकार्य पोहोचवण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. अतिवृष्टीमुळे राज्यात गोंदिया, भंडारा, गडचिरोली भागात पाणी साचले आहे, घरे पडली आहेत, शेती उद्धवस्त झाली आहे, अन्नदाता अडचणीत आला आहे त्यावर चर्चा झाली पाहिजे. यावर सरकारला निवेदन करण्याचे आदेश द्यावेत, असं ते म्हणाले.

Share