कमी बॉल्सवर जास्त रन काढण्याच्या नादात ईडी सरकार लवकरच ‘रनआऊट’ होईल राष्ट्रवादीचा टोला

मुंबई : कमी बाॅल्सवर जास्त रन काढण्याच्या नादात हे ईडी सरकार लवकरच ‘रनआऊट’ होईल, असा टोला राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी लगावला आहे. राजकीय लालसेपोटी ईडी सरकारकडून चुकीचे धोरण तर स्वीकारले जात नाही ना, अशी शंका महाराष्ट्रातील जनतेच्या मनात निर्माण होऊ लागल्याचे ते यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुजरातच्या हितासाठी ‘बुलेट ट्रेन’ चा निर्णय तत्परतेने घेतात, परंतु महाराष्ट्रातल्या अनेक विषयांवर निर्णय होत नाही, असेही महेश तपासे म्हणाले. एकीकडे न्यायालयीन खटला, दुसरीकडे नैराश्यग्रस्त बंडखोर आमदार आणि तिसरीकडे ठाकरे गटाला मिळणारा जनप्रतिसाद आणि त्यावर ‘सी वोटर’ चा लोकसभा निवडणुकीबाबत आलेला सर्व्हे या सर्व बाबींमुळे ईडी सरकार वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला.

कमी बॉलवर जास्त रन काढण्याच्या नादात असल्याची कबुली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच दिली आहे. त्यामुळे विश्वासघाताच्या आधारावर स्थापन झालेले शिंदे सरकार जास्त काळ टिकेल असे वाटत नाही, असेही महेश तपासे म्हणाले.

Share