उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची ‘सुलेमान सेना’ करून टाकली -आ. रवी राणा

नवी दिल्ली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची १४ मे रोजी मुंबईत सभा आहे. त्यात ते मर्दासारखे काम करतो वगैरे बोलतील;पण त्यांनी एका महिला खासदाराला तुरुंगात टाकून नामर्दपणाचे काम केले आहे. याला मर्दपणा म्हणत नाही. हनुमान चालिसा पठण करणाऱ्यांच्या विरोधात राजद्रोहाचे कलम लावले जाते. हे पाहून बाळासाहेबांना खूप दुःख होत असेल. बाळासाहेबांच्या शिवसेनेची उद्धव ठाकरेंनी ‘सुलेमान सेना’ करून टाकली आहे, असा घणाघात आमदार रवी राणा यांनी केला.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा करणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मुंबई सत्र न्यायालयाने त्यांची सशर्त जामिनावर सुटका केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राजद्रोह कायद्यासंदर्भात फेरविचार करण्यासाठी केंद्र सरकारने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राची दखल घेत राजद्रोहाचे कलम (१२४ अ) तात्पुरते स्थगित केले आहे. यावरील फेरविचार पूर्ण होईपर्यंत या कलमांतर्गत कोणताही गुन्हा दाखल केला जाऊ नये, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. यानंतर राणा दाम्पत्याने आज (११ मे) दिल्लीत पत्रकार परिषद घेत या निर्णयाबाबत भाष्य केले आहे.

या पत्रकार परिषदेत आ. रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, इंग्रजांविरुद्ध लढणाऱ्यांविरोधात राजद्रोहाचे कलम इंग्रजांनी लावले होते. आपल्या हिंदू संस्कृतीवर आलेले संकट, साडेसाती आणि महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी, लोडशेडिंग मोठ्या प्रमाणात वाढले आहे. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत तेव्हापासून महाराष्ट्राची दुर्दशा झाली आहे. अशा परिस्थितीतून हनुमान चालिसा वाचून त्यातून मुक्तता मिळाली पाहिजे या उद्देशाने आम्ही पाऊल उचलले होते. त्यावरून आमच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यामध्ये १४ दिवस कारागृहामध्ये ठेवले. या कायद्याला स्थगिती दिल्याने मी सुप्रीम कोर्टाचे आभार मानतो. खऱ्या अर्थाने इंग्रजांचा कायदा मोडून काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि कायदामंत्री किरेन रिजिजू यांनी काम केले आहे. उद्धव ठाकरे इंग्रजांच्या कायद्याचे पालन हनुमान चालिसा वाचणाऱ्यांच्या विरोधात करत असतील तर हे महाराष्ट्राचे दुर्भाग्य आहे; पण आज सुप्रीम कोर्टाने आज आम्हाला न्याय आणि देशाला दिलासा दिला आहे. त्याबद्दल मोदी सरकारचे आभार मानतो, असे आ. राणा म्हणाले.

२३ मे रोजी खासदार नवनीत राणा यांचा जबाब लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे नोंदवण्यात येणार आहे. मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी मुख्यमंत्र्यांना खूश करण्यासाठी एका महिला खासदाराच्या घरी पोलिस पाठवून त्यांना १४ दिवस कोठडीत ठेवले. याबाबत खा. नवनीत राणा आपले मत मांडणार आहेत, असे आ. राणा म्हणाले.

मुंबई महापालिकेच्या माध्यमातून आमच्या फ्लॅटला नोटीस दिली आहे. महापालिकेत भ्रष्टाचार करून मुख्यमंत्र्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या प्रॉपर्टी मुंबईत केल्या आहेत; पण आमच्याजवळ आमच्या मेहनतीचा एकच फ्लॅट आहे. फ्लॅट विकत घेतल्यानंतर १५ वर्षांनी उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून आम्हाला नोटीस देण्यात आली आहे. याविरोधात लढण्यासाठी आम्ही मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उतरू, असेही त्यांनी सांगितले.

Share