संपलेल्या पक्षावर आम्ही बोलत नाही, म्हणणाऱ्यांचं नावही संपलं

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून काल शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवण्यात आलं आहे. त्याचबरोबर शिवसेना हे नाव वापरण्यासही दोन्ही गटाला मनाई करण्यात आली आहे. यानंतर आता विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाला टोला लगावत म्हटलं आहे की, ”संपलेल्या पक्षावर आम्ही बोलत नाही. म्हणणाऱ्यांचं नावही संपलं आणि चिन्ह ही.” असं ते ट्वीट करत म्हटले आहे.

आम्ही तुम्हाला संपलेला पक्ष बोलणार नाही – आ. राजू पाटील
मनसे आमदार यांनीही निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते ट्वीट करून म्हणाले आहेत की, बंडखोरांपुढे लोटांगण घालून शेवटपर्यंत सत्ता टिकविण्याचा लाचार हव्यास नडला. त्यांची जर लगेचच पक्षातून हकालपट्टी केली असती, तर किमान पक्षावर नाव व चिन्ह गमावण्याची नामुष्की ओढावली नसती, असं त्ये म्हणाले आहेत. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी ठाकरे गटाला टोमणा लगावत म्हटले की, असो, तरी पण आम्ही तुम्हाला संपलेला पक्ष बोलणार नाही.

अमेय खोपकर यांनी काय म्हटलं आहे?
चिन्हं बदलतात… कुणाची गोठतात. आमचं रेल्वे इंजिन मात्र सुसाट धावतं आहे असं ट्विट मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी केलं आहे.

 

गजानन काळे यांनी काय म्हटलं आहे?
निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मनसे प्रवक्ता गजानन काळे यांनी देखील उद्धव ठाकरे गटाला लक्ष केलं आहे. काळे ट्वीट करत म्हटले आहे की, धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं आहे. या पुढे शिवसेना हे नाव पण वापरता येणार नाही. ते पुढे म्हणाले, ”आता शिल्लक सेना प्रमुख यांना राष्ट्रवादीचं घड्याळ, नाहीतर अबू आझमीच्या सायकलचाच आधार आहे. संपलेल्या पक्षाबद्दल बोलत नाही, असे म्हणणारे युवराज यांचा पक्ष आणि चिन्ह आता इतिहासात जमा.”

दरम्यान, निवडणूक आयोगानं शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह तात्पुरतं गोठवलं आहे. त्यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीसाठी दोन्ही गटांना धनुष्यबाण चिन्ह वापरता येणार नाही. ठाकरे आणि शिंदे या दोघांनाही सोमवारपर्यंत नव्या चिन्हासाठी पर्याय द्यावा लागणार आहे. दोन्ही गटांना ३ चिन्हांची निवड करून ती निवडणूक आयोगाकडे सादर करावी लागणार आहेत.

Share