शिवरायांचा अपमान उघड्या डोळ्यांनी पाहणारे सीमावासियांना काय न्याय देणार?

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सरकार शिवाजी महाराजांचा अपमान उघड्या डोळ्यांनी बघतात आणि अपमान करणाऱ्यांचा बचाव करतात, ते सीमा भागातील बांधवांना काय न्याय देणार  असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले की, आज जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, एकनाथ शिंदे, हे सुद्धा युतीमध्ये असताना या विषयाचे मंत्री होते. चंद्रकांत पाटलांवरही त्यावेळी जबाबदारी होती. हे दोघेही त्यावेळी किती वेळा बेळगावला गेले? मी त्यावेळी एकनाथ शिंदे यांना वारंवार विनंती केली होती की, मला बेळगावला जाऊ द्या, आपणही या. मात्र, तेव्हा कधी बेळगावात गेले नाही. मग आता तुम्ही मुख्यमंत्री म्हणून असे काय दिवे लावणार आहात? अशी टीका संजय राऊत यांनी केली.

मराठी भाषिकांवरील गुन्हे मागे घ्या
सर्वात आधी तुम्ही बेळगावाला जायला हवं, तिकडच्या मुख्यमंत्र्यांना भेटून तुम्ही सांगायला हवं की, सीमा भागातील मराठी तरुणांवर जे खोटे गुन्हे दाखल केले आहेत, ते खटले आधी काढून घ्या. पण ज्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सरकार शिवाजी महाराजांचा अपमान उघड्या डोळ्यांनी बघतात आणि अपमान करणाऱ्यांचा बचाव करतात, ते सीमा भागातील बांधवांना काय न्याय देणार? असा सवाल त्यांनी केला.

दरम्यान, आम्ही सातत्याने सीमाभागात जाऊन तिथल्या समस्या जाऊन घेतो आहे. आमचे शिवसैनिक १ नोव्हेंबरला तिथे जाऊन आले. मात्र, राज्य सरकारचा एकही मंत्री तिथे गेला नाही. सीमा भागातील मराठी नागरिकांवर आज अन्याय होत आहे. ते या देशातच राहात आहेत, ते काही पाकव्याप्त काश्मीरमध्ये राहत नाहीत. त्यामुळे तो भाग केंद्रशासित करावा, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली.

Share