सिध्दूने तर काम चोख केल…,भाजपचा नानांना टोला

मुंबई- काल झालेल्या पाच राज्याच्या मतमोजणीत भाजपला चार राज्यात यश प्राप्त झाले आहे तर आम आदमी पार्टीला पंजाबमध्ये सत्ता काबीज करण्यात यश आले आहे. देशातला दूसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हंटला जाणारा काँग्रेस पक्ष पाचही राज्यात भूई सपाट झाला आहे. पंजाबमधून काँग्रेसला फार मोठी अपेक्षा होती परंतू तिथे ही अंतर्गत वादामूळे काँग्रेसला फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत नाना पटोलेंवर टिका केली आहे.

पंजाब काँग्रेस अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू आणि आपले महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात बरंच सामन्य आहे. दोघेही बाहेरून काँग्रेसमध्ये गेलेले. दोघेही राहुल गांधींचे खास. दोघांनाही नुसत्या गावगप्पा करायची सवय. आता सिद्धूने तर काम चोख केलं, आता नाना मागे राहून कसं चालेल? असा खोचक सवाल या ट्वीटमध्ये विचारण्यात आला आहे.

पंजाबमध्ये काँग्रेसला अंतर्गत कलह भोवला-

पंजाब काँग्रेसमध्ये गेल्या सहा महिन्यात मोठ्या प्रमाणावर राजकीय कलह दिसून आला. आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी होते पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंद सिद्धू. याची सुरुवात सिद्धू आणि तत्कालीन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यातील वादाने झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन काँग्रेस पक्षालाच रामराम ठोकला. त्यानंतर पुन्हा एकदा सिद्धू यांचं नवे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांच्याशी बिनसले होते. हा देखील वाद विकोपाला जात असल्याचं दिसू लागताच काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी यात यशस्वी मध्यस्थी करून दोघांमध्ये समेट घडवून आणली. मात्र, एवढं करूनही पंजाबमध्ये काँग्रेसच्या पदरी निराशाच आली आहे

Share