काँग्रेसने राज्यसभा निवडणुकीसाठी त्यांच्या प्रमुख नेत्यांची सोय केली : संजय राऊत

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष इम्रान प्रतापगढी यांना महाराष्ट्रातून उमेदवारी जाहीर केल्याने राज्यातील पक्षाच्या नेत्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. दरम्यान, शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनीदेखील यावर भाष्य केले असून, काँग्रेसने देशभरात अनेक ठिकाणी त्यांच्या पक्षातील नेत्यांची सोय केली आहे. काँग्रेसने राज्यातील उमेदवार दिला असता तर बरे झाले असते, असे राऊत यांनी म्हटले आहे.

राज्याबाहेरील नेत्यांना महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठविण्याची परंपरा काँग्रेसने यंदाही कायम ठेवली आहे. राज्यसभा निवडणुकीत राज्यातील विधानसभेतील संख्याबळाच्या आधारे काँग्रेसचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. यावेळी काँग्रेसकडून महाराष्ट्रातील उमेदवाराला तिकीट मिळेल, असे राज्यातील काँग्रेस नेत्यांना वाटत होते; पण तसे घडले नाही. काँग्रेसने राज्यसभेच्या निवडणुकीसाठी विद्यमान खासदार पी. चिदम्बरम यांना तामिळनाडूतून तर महाराष्ट्रातून कव्वाली गायक व प्रियंका गांधी यांचे निकटवर्तीय समजले जाणारे इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी दिली आहे. प्रतापगढी यांची उमेदवारी रविवारी सकाळीच निश्चित करण्यात आली तेव्हा राज्यातील काँग्रेस नेत्यांनी दुसरा उमेदवार देण्याची मागणी दिल्लीत केली होती. विशेषत: अल्पसंख्याक विभागाच्या नेत्यांनी राज्याबाहेरील अल्पसंख्याक उमेदवाराला तिकीट देण्यास विरोध दर्शविला होता. मात्र, पक्ष नेतृत्वाने नेहमीप्रमाणेच राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत बाहेरचा उमेदवार लादला. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक यांना महाराष्ट्रातून उमेदवारी देण्याचे प्रस्तावित होते; परंतु राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी इम्रान प्रतापगढी यांच्या नावाला विरोध दर्शविल्याने वासनिक यांना राजस्थानातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्याऐवजी प्रतापगढी यांना राज्यातून उमेदवारी देण्यात आल्याचे काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात आले.

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने महाराष्ट्राबाहेरचा उमेदवार जाहीर केल्याने शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, काँग्रेसने देशभरात अनेक ठिकाणी त्यांच्या पक्षातील नेत्यांची सोय केली आहे. काँग्रेसने राज्यसभेच्या निवडणुकीसाठी राज्यातील स्थानिक उमेदवार दिला असता तर काँग्रेसला अधिक बळकटी मिळाली असती. स्थानिक उमेदवारीमुळे काँग्रेसचे राजकीय वर्तुळात वजन कायम रहायला मदत झाली असती.

काँग्रेसने कोणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा अंतर्गत प्रश्न
काँग्रेसची देशात जी स्थिती आहे ते पाहता फार कमी लोकांना ते संधी देऊ शकतात. पक्षात जी व्यवस्था करायची होती ती त्यांनी केली आहे. महाराष्ट्रातून इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी दिली आहे. आता यावर आम्ही काय बोलणार? काँग्रेसने राष्ट्रीय स्तराचा, इतर राज्यांचा विचार केलेला दिसत आहे. संसदेत भाजप सरकारला प्रत्युत्तर देणारी चांगली लोकं त्यांच्या नजरेत असू शकतात. कोणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यावर शिवसेनेने बोलणे योग्य नाही, असे राऊत म्हणाले.

मुख्यमंत्री मार्ग काढू शकतात
काँग्रेसमधील नाराजीवर बोलण्यास नकार देताना संजय राऊतांनी हा हायकमांडचा विषय असल्याचे सांगत जास्त भाष्य करणे टाळले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांमध्ये नेहमी चर्चा होत असते. काही मोठी गोष्ट असेल तर मुख्यमंत्री थेट सोनिया गांधींशी फोनवरून चर्चा करत असतात, असेही संजय राऊत म्हणाले. महाविकास आघाडीतील काँग्रेस नेत्यांच्या नाराजीबाबत विचारले असता राऊत म्हणाले, मुख्यमंत्री सक्षम आहेत. महाराष्ट्रात बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नाना पटोले अशा काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची उद्धव ठाकरेंसोबत चर्चा होत असते. निधीबाबत म्हणाल तर शिवसेनेचे आमदारही नाराज असतात. मुख्यमंत्री यावर मार्ग काढू शकतात.

भाजपने संभाजीराजेंची ढाल केली

संभाजीराजे छत्रपती यांना कशा प्रकारे फसवण्याचा प्रयत्न सुरू होता हे स्पष्ट झाले आहे. भाजपला आपला उमेदवार द्यायचाच होता, घोडेबाजार करायचाच आहे; पण त्यासाठी संभाजीराजेंची ढाल करण्याचा प्रयत्न झाला. आधी संभाजीराजेंना निवडणूक लढण्यास सांगितले आणि आता नावही घेत नाहीत. संभाजीराजेंना पुढे करून महाराष्ट्रातील राजकारणात गडबड करण्याचा प्रयत्न होता. अधिक पैसा खर्च करू शकतो, घोडेबाजार करू शकतो अशा पट्ट्यातून उमेदवार देण्यात आला आहे; परंतु मग संभाजीराजेंना बळीचा बकरा का केले? असा सवाल संजय राऊतांनी यावेळी केला.

शिवसेनेचे दोन्ही उमेदवार जिंकतील
लोकशाही असून प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे; पण महाराष्ट्रात कोणी घोडेबाजार करुन अशा पद्धतीच्या निवडणुका लढणार असतील तर सरकारचेदेखील सर्व घडामोडींवर लक्ष आहे, असे संजय राऊत म्हणाले. राज्यसभा निवडणुकीत विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा आमच्याकडे असून, शिवसेनेचे दोन्ही उमेदवार जिंकतील. महाविकास आघाडीचे आणखी दोन उमेदवारही (काँग्रेस आणि राष्ट्रवादी) विजयी होतील. अशाप्रकारे आमचे चार उमेदवार जिंकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Share