काँग्रेस हे बुडते जहाज, काँग्रेसमुळे माझे रेकॉर्ड खराब झाले : प्रशांत किशोर

पाटणा : काँग्रेस हे बुडते जहाज आहे. काँग्रेस पक्षामुळे माझे खूप नुकसान झाले आहे. काँग्रेसमुळे माझे रेकॉर्ड खराब झाले आहे, अशा शब्दांत राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. आता यापुढील काळात काँग्रेससोबत काम करणार नसल्याचा मोठा निर्णयही त्यांनी जाहीर केला आहे.

बिहारच्या हाजीपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन प्रशांत किशोर यांनी काँग्रेसवर कठोर टीका केली. काँग्रेस पक्षामुळे माझे रेकॉर्ड खराब झाले. हा पक्ष स्वत:मध्ये सुधारणा करत नाही. त्यामुळे हा पक्ष आमचेही नुकसान करेल. काँग्रेसबद्दल माझ्या मनात आदर आहे. मात्र, सध्या काँग्रेसची हीच परिस्थिती आहे. मी २०११ ते २०२१ या काळात एकूण ११ निवडणुकांमध्ये काँग्रेससोबत काम केले. यामध्ये एका निवडणुकीसाठी मी त्यांच्यासोबत काम केले आणि ही निवडणूक हरलो. त्यामुळे मी तेव्हापासूनच ठरवले होते की, यापुढे काँग्रेससोबत काम करणार नाही. मात्र, या पराभवानंतर मी खूप काही शिकलो, असे प्रशांत किशोर म्हणाले.

प्रशांत किशोर म्हणाले, मी २०१५ मध्ये जदयू नेते नितीश कुमार यांना भेटलो. त्यांनी मला बिहारला बोलावून काम करण्यास सांगितले. बिहारच्या विकासासाठी एक योजना सुरू करण्यात आली होती. त्यामध्ये काही युवकांना नोकऱ्या मिळाल्या. मात्र, मला अपेक्षित असलेल्या प्रमाणात त्या मिळाल्या नाहीत. २०१७ मध्ये बिहारमध्ये महाआघाडी करून निवडणूक लढवली. २०१७ मध्ये पंजाबमधील निवडणूक जिंकली. २०१९ मध्ये जगनमोहन रेड्डी यांच्यासोबत विधानसभा निवडणुकीत काम केले, तिथे त्यांचा पक्ष विजयी झाला आणि सत्तेत आला. २०२० मध्ये आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांच्यासोबत मी काम केले, त्यांचाही पक्ष दिल्लीत विजयी झाला. २०२१ मध्ये तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये काम केले. आम्ही ज्यांच्यासोबत काम केले, ते विजयी झाले. मात्र, २०१७ मध्ये एका निवडणुकीत आम्ही ज्यांच्यासोबत काम केले तो पक्ष काँग्रेस होता. काँग्रेसला त्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. आता आम्ही पुढील काळात काँग्रेससोबत काम न करण्याचा निर्णय घेतल्या असल्याचे प्रशांत किशोर म्हणाले.

काँग्रेस सुधारणार नाही, आपल्यालाही बुडवेल

प्रशांत किशोर यांनी काँग्रेस स्वत: सुधारणार नाही आणि आपल्याला बुडवेल, असे म्हटले. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभूत व्हावे लागले होते. तेव्हापासून त्यांच्यासोबत काम न करण्याचा निर्णय घेतला. या लोकांनी माझे रेकॉर्डदेखील खराब केले, असे ते म्हणाले. पश्चिम बंगालमध्ये भाजपसोबत एक पैज लावली होती. भाजपचा पराभव होणार आणि त्यांना १०० पेक्षा कमी जागांवर विजय मिळणार असे सांगितले होते. जर तसे न झाल्यास हे काम सोडण्याचे आव्हान मी दिले होते. मात्र, आम्ही भाजपला ७७ जागांवर रोखू शकलो, असेही ते म्हणाले.

दरम्यान, मागील महिन्यात प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी शक्यता व्यक्त केली जात होती. काँग्रेस पक्ष आणि प्रशांत किशोर यांच्यात याबद्दल चर्चादेखील झाली होती. मात्र, काही विषयांवर एकमत न झाल्यामुळे काँग्रेसमध्ये सामील होणार नसल्याचे किशोर यांनी ट्विट करून सांगितले होते. पक्षप्रवेश नाकारताना त्यांनी काँग्रेसला नेतृत्वाची गरज आहे आणि संघटनात्मक बदल करत पक्षामधील समस्या सामूहिकपणे दूर करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी नोंदवले होते. दरम्यान, आता प्रशांत किशोर यांनी काँग्रेसविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेसला त्यांनी बुडता पक्ष म्हटल्यामुळे काँग्रेस यावर काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Share