खोटी कागदपत्रे देऊन उजनीचे पाणी काटेवाडीला नेण्याचा घाट; अजित पवारांवर गंभीर आरोप

सोलापूर : उजनी धरणाचे पाणी लाकडी लिम्बोडी योजनेसाठी नेण्याच्या हालचाली पवार कुटुंबाकडून सुरू असून, खोटी कागदपत्रे तयार करून हे पाणी काटेवाडीला नेले जाणार असल्याचा गंभीर आरोप उजनी संघर्ष समितीचे संजय पाटील घाटणेकर यांनी आज पत्रकार परिषदेत केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून उजनीचे पाणी काटेवाडीला नेण्याचा घाट रचला जात असल्याचा आरोप संजय पाटील घाटणेकर यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

उजनीचे पाणी काटेवाडीला नेण्यासाठी काटेवाडी हा दुष्काळी भाग असल्याचा बारामती तहसीलदार यांचा दाखला सोबत जोडला असल्याचे सांगताना संजय पाटील घाटणेकर यांनी त्याबाबतची कागदपत्रे पत्रकार परिषदेत सादर केली.

काटेवाडीला गेल्या ७५ वर्षांपासून बारमाही पाणी मिळत असताना अवर्षण प्रवण क्षेत्र म्हणून खोटी कागदपत्रे जोडली आहेत. लाकडी लिम्बोडी ही योजना जुनी असल्याचे सांगण्याचा प्रयत्न होत असला तरी या योजनेवर ३१ जानेवारी २०२२ ची तारीख असल्याचे घाटणेकर यांनी दाखवून दिले. सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणावरील अनेक पाणी योजनांना १ रुपयाही दिला जात नसताना या योजनेला ३४६ कोटी रुपये कसे मंजूर झाले, असा सवाल त्यांनी केला.

हा सर्व घाट उजनी धरणाचे पाणी काटेवाडीला नेण्यासाठी अजित पवार यांच्याकडून केला जात असून, ही योजना रद्द झालीच पाहिजे, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन सोलापूर जिल्ह्यात केले जाईल, असा इशारा संजय पाटील घाटणेकर यांनी याप्रसंगी दिला. यावेळी माऊली हळणवर यांच्यासह उजनी संघर्ष समितीचे सदस्य उपस्थित होते.

यावेळी घाटणेकर यांनी सर्व पुराव्यांची कागदपत्रे सादर केली. विशेष म्हणजे संजय पाटील घाटणेकर हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असून, त्यांना पक्षाने करमाळा येथून उमेदवारी दिली होती. नंतर पक्षाने त्यांना उमेदवारी मागे घ्यायला लावून अपक्ष उमेदवार आणि सध्याचे विद्यमान आमदार संजय शिंदे याना पाठिंबा जाहीर केला होता. राष्ट्रवादीत प्रवेश करण्यापूर्वी संजय पाटील घाटणेकर हे बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष होते.

Share