…तर राष्ट्रवादीने भाजपसोबत हातमिळवणी केली असती गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट

जळगाव : शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी एक खळबळजनक विधान केलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही उठाव केला नसता, तर राष्ट्रवादीने भाजपसोबत हातमिळवणी केली असती, असा गौप्यस्फोट गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दावा केला आहे की, राष्ट्रवादीचे १० ते १२ आमदार फुटले आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाचा फक्त मुहूर्त ठरायचा बाकी आहे. तसेच, शिंदे सरकारने हा उठाव केला नसता तर राष्ट्रवादी भाजपसोबत गेली असती असा गौप्यस्फोटही गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

सध्या शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शिबीर सुरु आहे. या अधिवेशनानंतर सरकार कोसळेल असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जात आहे. या विषयी देखील पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना विचारण्यात आलं. यावर गुलाबराव पाटील म्हणाले की, राष्ट्रवादीचे अधिवेशन संपलं आहे, पण सरकार कोसळण्याची आम्ही वाट पाहत आहोत. आपल्या कार्यकर्त्यांचा उत्साह कायम राहावा तसेच आमदारांमध्ये फूट पडू नये, म्हणून राष्ट्रवादीकडून अशा प्रकारचे सांगितलं जात असल्याचे वक्तव्य पाटील यांनी केलं. आमचं सरकार दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वासही गुलाबराव पाटलांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, पक्ष सोडणे गैर नाही, परंतु ज्या घरात वाढले, ज्या घराने ओळख दिली. त्यासोबत गद्दारी करण चुकीचा आहे, असे म्हणत अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला होता. यावर अजित पवारांना गुलाबराव पाटील यांनी प्रतिउत्तर दिले आहे. आम्ही पक्ष कुठे सोडला आहे. आम्ही मूळ शिवसेना आहोत, बोर्डावर पक्षाचे नावही तेच आहे, आम्ही भाजपमध्ये गेलो का, आम्ही बाळासाहेबांची शिवसेना आहोत. त्यापद्धतीने आम्हाला ढाल तलवार चिन्हही मिळाले आहे. आम्ही पक्षांतर केलेले नाही, जे पक्षांतर करतात त्यांच्यासाठी अजित पवारांचे वक्तव्य असेल असे गुलाबराव पाटील म्हणाले.

Share