गुजरातमध्ये मीठ कारखान्यात भिंत कोसळून १२ मजूर ठार

अहमदाबाद : गुजरातमधील मोरबी जिल्ह्यातील हलवाद जीआयडीसी येथे मीठ तयार करणाऱ्या एका कारखान्यात मोठी दुर्घटना घडली आहे. बुधवारी सकाळी या कारखान्याची एक भिंत कोसळल्याने तब्बल १२ मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून, अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमध्ये मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. आणखी ३० जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

मोरबी जिल्ह्यातील हलवड जीआयडीसी येथील हलवड औद्योगिक परिसरात सागर सॉल्ट पॅकेजिंगचा कारखाना आहे. बुधवारी सकाळी या मीठ कारखान्याची भिंत अचानक कोसळली. भिंत कोसळल्याने या कारखान्यात काम करणारे अनेक कामगार भिंतीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. त्यात १२ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे, तर अनेक जण गाडले गेल्याची भीती आहे. बचाव पथके घटनास्थळी असून भिंतीखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्यात येत आहे. आतापर्यंत ९ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

गुजरातचे कामगार आणि रोजगारमंत्री आणि स्थानिक आमदार ब्रिजेश मेरजा यांनी सांगितले की, हलवड औद्योगिक परिसरात असलेल्या समुद्री मीठ कारखान्यात ही दुःखद घटना घडली. कारखान्यातील किमान १२ कामगारांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या इतरांना वाचवण्याचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत, असे ते म्हणाले.

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी मोरबी येथील मीठ कारखान्याची भिंत कोसळून मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक कामगाराच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ४ लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी मोरबीचे जिल्हाधिकारी आणि यंत्रणा चालकांना तात्काळ बचाव आणि मदत कार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पंतप्रधानांकडून शोक व्यक्त; मृतांच्या कुटुंबीयांना २ लाखांची मदत
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोरबी येथील दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. मोरबी येथील कारखान्याची भिंत कोसळून झालेली घटना हृदय हेलावणारी आहे. या दुःखाच्या प्रसंगी माझ्या संवेदना शोकाकुल कुटुंबीयांसोबत असून, अपघातात जखमी झालेले मजूर लवकर बरे होवोत, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत व्यक्त केल्या आहेत. पीएमओने केलेल्या ट्विटमध्ये, पंतप्रधानांनी या अपघातात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये दिले जाणार आहेत.

Share