‘इस्लाम हा धर्मच नाही’, कालिचरण महाराजांचे वादग्रस्त वक्तव्य

नाशिकः  महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारे अकोल्याचे कालिचरण महाराज पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. काही दिवसांपूर्वी महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. अनेकांनी कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार त्यांना अटकही करण्यात आली होती. आज पुन्हा त्यांनी इस्लाम धर्माबाबत वादग्रस्त विधान केले आहे. कालीचरण महाराज नाशिक दौऱ्यावर असतांना त्यांनी ‘इस्लाम धर्मच नाही’ असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

कालिचरण महाराज नाशिक दौऱ्यावर आले असताना त्यांनी हे विधान केले की, ‘इस्लाम हा धर्मच नाही..हा वाद धर्म विरुद्ध अधर्म आहे’, हिंदूंना जर कुटुंबासह धर्माचं संरक्षण पाहिजे तर हिरीरीने राजकारणात लक्ष द्यायला हवं. मुस्लिमांचे १०० टक्के मतदान हे फक्त इस्लामसाठी होते. जर आई-बहिणींना वाचवायच असेल तर ते फक्त राजनीतीनेच वाचविता येऊ शकते. म्हणून मी मोदींच्या कामावर प्रसन्न आहे, जो हिंदू हिताची गोष्ट करेल त्याला जाहीर पाठिंबा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

पुढे ते म्हणाले कि, हिंदूंची पाच लाख प्रार्थना स्थळे फोडण्यात आली आहेत. ती परत मिळवणे गरजेचे आहे. यासाठी मोदी, शहा, योगी देशाला तारतील, असेही ते म्हणाले. राज ठाकरेंच्या भूमिकेवर स्पष्टीकरण देताना म्हणाले कि, हिंदुत्वासाठी जे काही होईल त्याचा सन्मानचं करण्यात येईल. तसेच शरद पवारांचे वैयक्तिक आयुष्य आहे. पण सोशल मीडियामुळे सर्वच जण बघत आहेत, असे कालिचरण महाराज यांनी म्हटल.

Share