घाबरलेला भोंगा आज महाराष्ट्रानं पाहिला, दीपाली सय्यद यांचा राज ठाकरे यांच्यावर निशाणा

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहातील सभेत जोरदार हल्लाबोल केला. राज ठाकरेंनी सभेत आपण मशिदीवरील भोंग्यांविरोधातील आंदोलन थांबवलेलं नाही असे जाहीर केलं. याच मुद्द्यावरुन शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्याद यांनी राज ठाकरेंवर टिका केली आहे.

दीपाली सय्यद यांनी ट्विट करत म्हटलं, “पत्रक घरोघरी दिल्यानंतर तुम्ही आंदोलन करून जेल मध्ये जाणार आणि अमित ठाकरे लपून बसणार हा शिलेदारांसाठी मोठा ट्रॅप आहे. घाबरलेला भोंगा आज महाराष्ट्राने पाहिला, असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. राज ठाकरेंच्या भाषणावर टीका करताना दीपाली सय्यद यांनी घाबरलेला भोंगा आज महाराष्ट्रानं पाहिला,असं म्हटलंय.

दरम्यान आजच्या सभेत राज ठाकरे म्हणाले, आज भोंग्यांचा विषय काढला आणि भारताच्या इतिहासात पहिल्यांदा सकाळच्या अजान बंद झाल्या. जवळपास ९२ ते ९४ टक्के, ठिकाणी आवाज कमी झाले आहेत. खरंतर माझी मागणी आवाज कमीची नाहीचय तर लाऊडस्पीकरच निघाले पाहिजे.

राज ठाकरे पुढे म्हणाले, लाऊडस्पीकरचं आंदोलन हे एकादिवसाचं आंदोलन नाहीये. या गोष्टीला जर सातत्य नसेल तर पुन्हा सर्व गोष्टी सुरू होतील. ते फक्त तुम्हाला चेक करत आहेत. तुम्हाला तपासत आहेत. हे जिवंत आहेत, हे विसरले सोडून द्या. हळूहळू पुन्हा आवाज वर यायला सुरू होणार. सारख्या सारख्या गोष्टी होत नाहीत. आत्ता सुरू केलं आहे ना… एकदाचा तुकडा पाडून टाका. म्हणून मी आता एक पत्र तुम्हा देणार आहे. आत्ता नाही येत्या दोन-चार दिवसात तुम्हाला पत्र देईल. माझ्या सर्व महाराष्ट्रसैनिकांना विनंती आहे की, प्रत्येक घराघरात हे पत्रक पोहोचलं पाहिजे. हे आंदोलन आहे. प्रत्येकवेळी आंदोलन रस्त्यावर येऊन केलं पाहिजे हे गरजेचं नाहीये.

Share