महाराष्ट्र अशी वक्तव्ये कदापि खपवून घेणार – अजित पवार

मुंबई : तुम्ही महाराष्ट्र मागायला निघालात का? कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र काय असा-तसा वाटला का? असा संतप्त सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.  ते राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालय येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील गावांवर दावा केल्यानंतर आता अक्कलकोट वरही कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी दावा केला. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी अशी वक्तव्य करणे ताबडतोब थांबवावे, त्याचे हे वक्तव्य निंदनीय असून त्याचा निषेध करतो. लोकांचे लक्ष महागाई आणि बेरोजगारीवरून हटवण्यासाठी अशी वक्तव्य केली जात आहेत. सध्या कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात काय संचारले आहे का माहित. आता फक्त मुंबई मागणे बाकी ठेवले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी कडक शब्दात त्यांना सुनावले पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.

प्रत्येक राज्याच्या अस्मितेचा प्रश्न असतो. अनेक मुख्यंत्र्यांनी राज्याला एकसंघ ठेवण्याचा काम केले आहे. आता काहीही कारण नसताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बोलले आहेत त्यामुळे महाराष्ट्र सरकारने आपली भूमिका मांडली पाहिजे. केंद्रानेही यामध्ये तात्काळ हस्तक्षेप करावा. महाराष्ट्र अशी वक्तव्ये कदापि खपवून घेणार नाही, असे अजित पवार यांनी सांगितले.

काय म्हणाले आहेत बोम्मई?
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावर चिथावणीखोर वक्तव्य केलं असून त्यांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. देशाची जमीन, पाणी आणि सीमांचं रक्षण करण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे. कर्नाटकच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही. महाराष्ट्रातील सोलापूर, अक्कलकोट या कन्नड भाषिक भागांनी कर्नाटकात सामील व्हावं, अशी आमची मागणी आहे.

Share