उष्माघातामुळे दीड हजार कोंबड्यांचा मृत्यू

वर्धा : उष्माघातामुळे एका पोल्ट्री फार्ममधील दीड हजारपेक्षा जास्त कोंबड्या मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील बाबापूर येथे ही घटना घडली. या घटनेमुळे कुक्कुटपालनाचा व्यवसाय करणाऱ्या शेतकार्याचे सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

बाबापूर शिवारातील सागर पचगडे नावाच्या युवा शेतकऱ्याने हिमतीने कुक्कुटपालन करण्याचे ठरवले. त्यासाठी पचगडे यांनी पैशांची गुंतवणूक केली. मात्र, मागील काही दिवसांपासून तापमानात वाढ झालेली आहे. वर्धा जिल्ह्याचे तापमानही सध्या चांगलेच वाढत आहे. याच वाढत्या उन्हाचा फटका पचगडे यांना बसला. उन्हामुळे त्यांच्या पोल्ट्री फार्ममधील दीड हजार कोंबड्या एकाच दिवसात मरण पावल्या. यामध्ये त्यांचे तब्बल पाच लख रुपयांचे नुकसान झाले आहे.

पचगडे यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये सात हजार पक्षी आहेत. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी त्यांनी पुरेसे हिरवे आच्छादन टाकलेले होते. तसेच वाढत्या तापमानाचा कोंबड्यांवर परिणाम होऊ नये म्हणून स्प्रिंकलरने पाणी शिंपडले जात होते. मात्र, १ जून रोजी भारनियमन करण्यात आल्याने स्प्रिंकलर बंद पडले. त्यातच जनरेटरमधील डिझेलही संपले. याच कारणामुळे २ जूनपासून पचगडे यांच्या पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांनी मान खाली टाकायला सुरुवात केली.

२ जूनच्या रात्रीतून एक हजारावर कोंबड्या मरण पावल्या. आज सकाळपर्यंत सोळाशे कोंबड्या मृत झाल्याचे पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. व्ही. वंजारी यांनी सांगितले. मृत कोंबड्यांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. यावेळी वीज खंडित करण्यात आल्याने हा अनर्थ झाल्याचा आरोप पचगडे यांनी केला आहे. तसेच शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Share