….अन्यथा राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाबाबत शेवटच्या ५ मिनिटांत निर्णय घेऊ; बच्चू कडूंचा इशारा

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेसाठी रिंगणात उतरलेल्या संजय पवार यांना विजयी करण्यासाठी मतांची जुळवाजुळव करण्यात शिवसेनेला नाकीनऊ येत असतानाच आता महाविकास आघाडी सरकारमधील शिक्षण आणि जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी ऐनवेळी ठाकरे सरकारला कोंडीत पकडले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलून धान खरेदी सुरू करावी, अन्यथा आम्ही राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाबाबतचा निर्णय शेवटच्या पाच मिनिटांमध्ये निर्णय घेऊ, अशा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि शिवसेनेत खळबळ उडाली आहे.

प्रहार संघटना आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष असलेले बच्चू कडू हे महाविकास आघाडी सरकारमध्ये शिक्षण आणि जलसंपदा विभागाचे राज्यमंत्री आहेत. २०१९ च्या निवडणुकीत बच्चू कडू हे अपक्ष आमदार म्हणून विधानसभेवर निवडून आले असून. शिवसेनेच्या कोट्यातून त्यांना मंत्रिपद मिळाले आहे. राज्यसभेची निवडणूक येत्या १० जूनला होत असून, ऐन या निवडणुकीच्या तोंडावर राज्यमंत्री बच्चू कडू शेतकऱ्यांना मिळणाऱ्या धान आणि हरभऱ्याच्या अनुदानाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रात हरभरा उत्पादकांची संख्या एक लाख आहे आणि धान उत्पादकांची संख्या चार ते पाच लाख इतकी आहे. आता केंद्र सरकार माल खरेदी करण्यासाठी हात वर करत आहे. केंद्र सरकारने खरेदी नाही केली तर एका हेक्टरला चार हजार रूपये मदत हरभरा आणि धान उत्पादकांना द्यायला पाहिजे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली पाहिजे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीने हालचाली कराव्यात. राज्यसभा निवडणुकीत आमचे मतदान भाजपला जाणार नाही. मात्र, महाविकास आघाडीला देखील शेवटच्या पाच मिनिटांत मतदान करू, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी सहाव्या जागेसाठी प्रचंड चुरस आहे. या जागेवरून शिवसेनेने संजय पवार तर भाजपने धनंजय महाडिक यांना रिंगणात उतरवले आहे. ही जागा निवडून आणण्यात अपक्ष आमदारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यासाठी सत्ताधारी शिवसेना आणि विरोधी पक्ष भाजप हे दोन्ही पक्ष अपक्ष आमदारांच्या संपर्कात आहेत. तसेच महाविकास आघाडीचे आमदार आणि मित्रपक्षांची मते फुटणार नाही, यासाठीदेखील ठाकरे सरकार काळजी घेत आहे. त्यात आता ऐनवेळी बच्चू कडू यांनी ठाकरे सरकारला हा इशारा दिला आहे. राजकीय वर्तुळात बच्चू कडू यांच्या या विधानची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यांचा एकंदरित सूर पाहता राज्यसभा निवडणुकीत ऐनवेळी बच्चू कडू काही वेगळी भूमिका घेतात का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Share