शिंदे सरकारवर नामुष्की! पहिलाच प्रश्न राखीव ठेवण्याची वेळ

मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विचारलेल्या प्रश्नावर शिंदे सरकराला उत्तर देता आलं नाही. त्यामुळे उत्तर नसल्याने पहिल्याच प्रश्न राखीव ठेवण्याची नामुष्की शिंदे सरकारवर ओढवली.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी, पालघर जिल्ह्यात हत्तीरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत यंत्रणेसाठी मंजूर अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे, भरण्यात आलेली पदे, रिक्त पदांची संख्या, हत्तीरोग प्रतिबंधक उपाययोजनांसाठी मंजूर निधी, मागील वर्षात खर्च झालेला निधी या प्रश्नांची उत्तरे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांना विचारली होती. ही माहिती आरोग्यमंत्र्यांकडे नसल्याने त्यांना उत्तर देता आले नाही आणि प्रश्न उत्तरासाठी सोमवारपर्यंत राखून ठेवण्यात आला.

पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगाच्या प्रादुर्भावाचा प्रश्न गंभीर असून ऑक्टोबर २०२१ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातल्या ८० बालकांना रोगाची लागण झाल्याचे आढळून आलं आहे. डहाणू, विक्रमगड, तलासरी तालुक्यातील २९ बालकांना या रोगाची लागण झाली आहे. यासंदर्भात प्रश्न विचारताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी डासांमुळे पसरणारा हत्तीरोग गंभीर असून त्यामुळे शरीर विद्रुप व अकार्यक्षम होते. लागण झाल्यावर या आजारावर परिणामकारक उपचार नाहीत. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्वाच्या आहेत. याकडे लक्ष वेधलं.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जिल्ह्यातील प्रतिबंधात्मक उपाययोजना कार्यक्षम होण्यासंदर्भात प्रश्न विचारला होता. हत्तीरोग नियंत्रण यंत्रणेसाठी मंजूर अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे, त्यापैकी भरण्यात आलेली पदे, रिक्त पदांची संख्या, हत्तीरोग प्रतिंबंक उपाययोजनांसाठी पालघर जिल्ह्यासाठी मंजूर निधी व वर्षभरात खर्च झालेला निधी या प्रश्नांची उत्तरे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांना देता आली नाहीत. त्यामुळे हा प्रश्न उत्तरासाठी सोमवापर्यंत पुढे ढकलण्यात आला.

Share