विकासाच्या नावाखाली जनतेला गूळ दाखवण्याची शरद पवारांची जुनी परंपरा

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाची फसवणूक केली आहे. मध्य प्रदेशमध्ये ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण मिळते मग महाराष्ट्रात का नाही? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. शरद पवार यांनी विकासाच्या नावाखाली जनतेला गूळ दाखवला आहे. फसवणूक करणे आणि गूळ दाखवणे ही त्यांची परंपरा आहे, असा टोलाही पाटील यांनी लगावला आहे.

ओबीसी समाज आता महाविकास आघाडी सरकारच्या भूलथापांना बळी पडणार नाही. कारण महाविकास आघाडी सरकारला ओबीसींना आरक्षण द्यायचे नाही हे समाजाला कळल्याने ते भडकले आहेत, म्हणून त्यांनी आता या सरकरच्या विरोधात आंदोलन छेडले आहे, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

ते म्हणाले, ओबीसी समाजाचा महाविकास आघाडी सरकारवर राग आहे. आरक्षणाच्या बाबतीत त्यांनी समाजाची फसवणूक केली असल्याचे ओबीसींना माहीत झाले आहे. त्यामुळे त्यांनी आता भाजपला आरक्षण मिळवून देण्यासाठी विनंती केली आहे. ओबीसी समाजाच्या मनामध्ये राग आहे. तो व्यक्त करण्यासाठी आणि सरकारला जाब विचारण्यासाठी आज ओबीसी समाज रस्त्यावर उतरला आहे. भाजपने यावर मार्ग काढावा यासाठी समाजाने विनंती केली आहे.

मध्य प्रदेश सरकारने त्रिस्तरीय चाचणी (ट्रिपल टेस्ट) ताकदीने पूर्ण करून दिल्या आहेत. ओबीसी आरक्षणासंदर्भातील तरतुदी न्यायालयाला पटवून देऊन पुन्हा ओबीसींचे राजकीय आरक्षण मिळवले आहे. वेळ असूनही महाराष्ट्र सरकारने दोन वर्षांपूर्वी त्रिस्तरीय चाचणीसंदर्भात पावले उचललेली नाहीत. जनतेचा भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास असल्यामुळे ओबीसी आरक्षणासाठी भाजपने आंदोलन पुकारले आहे, असे पाटील यांनी सांगितले.

Share