राज्यात दंगली घडविण्याचा काहींचा कट : जयंत पाटील

सांगली : राज्यात दंगली व्हाव्यात, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हावा यासाठी काही लोकं प्रयत्न करत आहे. त्यांच्या या यांच्या डावात आपल्याला फसायचे नाही. आपल्या राज्यात शांती, प्रेम प्रस्थापित राहो यासाठी आपण सर्वच प्रयत्न करूयात आणि आपला सामाजिक एकोपा जपूया, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीय यांनी केले आहे.

आज भारतात, राज्यात एक विचित्र परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. अल्पसंख्याक बांधवांच्या हक्कावर कोण गदा आणू पाहत आहे याची कल्पना आपल्याला आहे. मात्र महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांना आम्ही धक्का लागू देणार नाही, त्यासाठी पडेल ती किंमत मोजायला राष्ट्रवादी काॅँग्रेस तयार आहे. असंही पाटील यांनी सांगितलं. उरुण-इस्लामपूर शहरातील ईदगाह व शादीखाना कामाचा शुभारंभ सोहळा काल पार पडला. अल्पसंख्याक मंत्री मंत्री जितेंद्र आव्हाड, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते हा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अतिशय देखणी आणि उपयुक्त वास्तू उभारण्याचे काम येत्या काळात आपल्याला करायचे आहे. या भागातील बांधवानी खुप मदत केली आहे. प्रत्येक निवडणुकीत साथ दिली आहे. त्याची ही छोटीशी उतराई होण्याचा प्रयत्न केला असल्याचे जयंत पाटील म्हणाले.

सुडबुद्धीने मलिकांना आत टाकले
महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर अल्पसंख्याक विभागामार्फत हे काम मंजूर करून घेतले होते. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची मोठी साथ लाभली होती. खरंतर ते आज या कार्यक्रमाला पाहिजे होते, मात्र सूडबुद्धीने त्यांच्यावर कारवाई करून जेलमध्ये टाकण्याचे काम अस्वस्थ मंडळींनी केले आहे, असेही पाटील यांनी सांगितलं

उर्दु शाळांचा विकास करणार
मुस्लिम बांधवांनी प्रगती करावी यासाठी आमचा सर्वांचाच कायम प्रयत्न राहीला आहे. या समाजातील लोक शैक्षणिक क्षेत्रातही पुढे जावे यासाठी आम्ही काम करत आहोत. म्हणून येत्या काळात या भागातील उर्दु माध्यमिक शाळेचाही विकास आम्ही करणार आहोत असे आश्वासन पाटील यांनी दिले.

कोल्हापूरमध्ये पक्षाच्या मेळाव्यात आम्ही सर्वांनी महाराष्ट्राचा पुरोगामी विचार राखण्याची शपथ घेतली आहे. कारण अलिकडे काही लोक समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. लोक भोंग्यांवर बोलत आहेत, कोणाच्या तरी घरी हनुमान चालीसा म्हणण्याचा हट्ट करत आहे. ज्यावेळी एखाद्या राज्यकर्त्याचा आत्मविश्वास कमी होतो, त्यावेळी आपण पुन्हा निवडून येणार नाही अशी भीती असते, तेव्हाच असे वातावरण तयार केले जाते असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Share