मराठीला ‘अभिजात’ दर्जाच्या मागणीसाठी ४ हजार पोस्ट कार्ड राज्य सरकारकडून राष्ट्रपतींकडे रवाना

मुंबई : मराठी भाषेला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी असलेली ४ हजार पोस्ट कार्ड आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रपतींकडे रवाना करण्यात आली. याप्रसंगी वर्षा शासकीय निवासस्थानी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, खासदार अरविंद सावंत उपस्थित होते.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली एक जन अभियान सुरू करण्यात आले आहे. हा ‘अभिजात’ दर्जा २७ फेब्रुवारी २०२२ रोजी मराठी भाषा दिवस आहे त्याआधी मिळावा, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज मुख्यमंत्री  ठाकरे यांच्या हस्ते सुमारे ४ हजार पोस्ट कार्ड महामहीम राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांना पाठविण्यात आली. हा पोस्ट कार्डचा दुसरा संच आहे, याआधीसुद्धा एक संच राष्ट्रपती महोदयांना पाठविण्यात आला आहे.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी गेली अनेक वर्षे प्रयत्न सुरु आहेत. पण अद्याप याबाबत ठोस निर्णय काही झालेला नाही. यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा चालू आहे.  या पार्श्वभूमीवर मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली एक जनअभियान सुरु करण्यात आले असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे याचिका पाठवण्यात येणार आहेत.

देशातल्या अभिजात भाषांचा प्रवास हा २००४ मध्ये देशात तामिळ ही अभिजात भाषेचा दर्जा मिळवणारी पहिली भाषा ठरली त्यानंतर २००५ मध्ये संस्कृत, २००८ मध्ये कन्नड आणि तेलुगू, २०१३ मध्ये मल्याळम आणि २०१४ मध्ये ओडिया भाषांना हा दर्जा दिला गेला.  महाराष्ट्र सरकारने २०१२  मध्ये याबाबत एक भाषा समिती स्थापन केली, त्या समितीने आपला अहवाल २०१३ मध्ये पूर्ण केला. तेव्हापासून म्हणजे जवळपास ९ वर्षे ही मागणी केंद्राकडे पडून आहे.

Share