महागाईविरोधात काॅँग्रेसचे ३१ मार्चपासून राज्यव्यापी आंदोलन – नाना पटोले

मुंबई : केंद्रातील भाजप सरकार महागाईवर नियंत्रण  मिळवण्यात अपयशी ठरले आहे. देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या काळात १३६ दिवस पेट्रोल, डिझेलची दरवाढ रोखून धरली आणि निवडणूका संपताच दररोज दरवाढ केली जात आहे. सर्वसामान्यांचा त्रस्त करणाऱ्या महागाईविरोधात आवाज बुलंद करत झोपी गेलेल्या केंद्रातील भाजप सरकारला जागे करण्यासाठी ३१ मार्चपासून राज्यभर महागाईमुक्त भारत आंदोलनाचा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

नाना पटोले पुढे बोलताना म्हणाले की,गरज सरो, वैद्य मरो, या म्हणीसारखा भाजपाचा कारभार आहे. निवडणुकीत जनतेच्या रोषाला सामारे जायला नको म्हणून इंधन दरवाढ रोखून धरली आणि निवडणूका संपल्या मते घेतली निवडणूक आले आणि लगेचच जनतेवर महागाईचा भार टाकण्यास सुरुवात केली आहे. मागील पाच दिवसात पेट्रोल, डिझेल ३.२० रुपये प्रतिलिटर महाग झाले आहे. तर एलपीजी गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महाग झाला आहे. काही ठिकाणी एलपीजी सिलिंडर १००० ते  ११०० रुपये एवढ्या किंमतीला घ्यावा लागत आहे. सीएनजी, पीएनजी गॅस तसेच खाद्यतेलाचे दरही वाढले असून २ एप्रिलपासून औषधांचे दरही वाढणार आहेत. केंद्रातील मोदी सरकार जनतेला महागाईच्या खाईत लोटात असून त्याबद्दल त्यांना काही वाटत नाही.

 

मोदी सरकारच्या या निर्णयाचे चटके देशातील जनता भोगात असून केंद्र सरकारला जागे करण्यासाठी ३१ मार्च रोजी सकाळी ११ वाजता सर्व काॅँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करतील. तर २ एप्रिल दरम्यान सर्व जिल्हा मुख्यालयी महागाईमुक्त भारत धरणे आंदोलन व मोर्चा आयोजित केला आहे. तर ७ एप्रिल रोजी राज्य मुख्यालयी मुंबईत महागाईमुक्त भारत धरणे आंदोलन व मोर्चाचे आयोजन केले आहे. ह्या आंदोलनात काॅंग्रसेचे सर्व मंत्री, नेते, आमदार, खासदार, पदाधिकारी, व कार्यकर्ते  मोठ्या संख्येने सहभागी होतील सर्वसामान्य जनतेने, स्वयंसेवी संघटनानी रिक्षा टॅक्सी असोसिएशन यांनीही या आंदोलनात सहभागी होऊन केंद्र सरकारकडून सुरु असलेल्या दरोखोरीविरुद्ध आवाज उठवावा. पक्षांच्या कामगार संघटनांनी २८ व २९ मार्च रोजी देशव्यापी संप पुरकारला आहे.  या संपाला काँग्रेसने पाठिंबा दिला आहे, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे.

Share