‘मविआ’ सरकार अल्पमतात; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा : नारायण राणे

सिंधुदुर्ग : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठीच्या निवडणुकीत भाजपच्या धनंजय महाडिक यांनी बाजी मारत शिवसेनेच्या संजय पवार यांना पराभवाची धूळ चारली. महाविकास आघाडीचे आठ ते नऊ आमदार फुटले आहेत. याचाच अर्थ महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, अशी टीका करत भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

राज्यसभेच्या महाराष्ट्रात सहा जागांसाठी शुक्रवारी (१० जून) निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीचे प्रत्येकी तीन उमेदवार निवडून आले आहेत. या निवडणुकीत सहाव्या जागेसाठी सहाव्या जागेसाठी भाजप आणि महाविकास आघाडीने जोरदार ताकद लावल्याने ही लढत प्रतिष्ठेची झाली होती. अटीतटीच्या लढतीत भाजपच्या धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवार यांना पराभवाची धूळ चारत विजय मिळवला. या पार्श्वभूमीवर भाजपचा आत्मविश्वास दुणावला असून, भाजप नेत्यांकडून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला लक्ष्य करण्यात येत आहे. भाजपचे तिन्ही उमेदवार राज्यसभेवर निवडून आल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा भाजपकडून जल्लोष करण्यात आला. या कार्यक्रमास भाजपचे नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.

संजय राऊत काठावर पास  
यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. नारायण राणे म्हणाले, शिवसेना सांगत होती की, तीन जागा जिंकणार; पण शेवटी काय झाले? संजय राऊतदेखील काठावर पास झाले. संजय राऊत फक्त एका मताने पराभूत होण्यापासून वाचले. आमच्या हातून संजय राऊत वाचले. ते सत्तेत आहेत. त्यांना महाविकास आघाडीची मते मिळायला हवी होती. तेवढीही मते त्यांना मिळाली नाहीत.

उद्धव ठाकरेंना सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही
राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या आठ ते नऊ आमदारांची मते फुटली आहेत. याचाच अर्थ महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे. बहुमतासाठी १४५ आमदारांचे पाठबळ लागते, तुमच्याकडे तेही नाही. तुम्ही महाराष्ट्राला १० वर्ष मागे नेले आहे. सत्तारुढ आणि विरोधक यांच्यात लोकशाहीमध्ये जे नाते असते हे नाते तुम्ही या निमित्ताने धुळीला मिळवले. तुम्हाला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. स्वत:चे आमदार सांभाळू शकत नाहीत आणि बढाया मारतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नैतिकतेचे भान असेल तर राजीमाना द्या आणि बाजूला व्हा, अशी मागणी नारायण राणे यांनी केली.

शरद पवारांकडून काहीतरी शिका
लोकांची जमावजमव करण्यात त्यांना यश आले, असे म्हणत राज्यसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले होते. यावरून राणे यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे. मी संजय राऊत यांना काहीही किंमत देत नाही, त्यांनी शरद पवारांकडून काहीतरी शिकावे, असे राणे यांनी म्हटले आहे.

Share