मशिदीवरील भोंगे उतरवले; राज ठाकरेंकडून योगी सरकारचे अभिनंदन

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले आहे. योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमधील धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवल्याबद्दल राज ठाकरेंनी ट्विट करत त्यांचे अभिनंदन केले आहे.  राज ठाकरे यांनी ट्विटमध्ये “उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार” असं म्हटलं आहे. याशिवाय याच ट्विटमधून राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

आमच्याकडे महाराष्ट्रात योगी कुणीच नाही आहे ते फक्त सत्तेचे भोगी, महाराष्ट्र सरकारला सदबुद्धी मिळो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना. असं राज ठाकरे म्हणाले आहेत. राज ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांचं अभिनंदन करताना महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. राज ठाकरे यांनी २ एप्रिलच्या सभेत देखील उत्तर प्रदेश सरकार, योगी आदित्यनाथ आणि नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं होतं.

योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमधील धार्मिक स्थळांवरील भोगे विशेषता मशिदीवरील अनधिकृत भोंगे उतरवले होते. योगी आदित्यनाथ यांनी तिथल्या प्रशासनाला कारवाई करुन ३० एप्रिलपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. योगींच्या आदेशानंतर १२५ ठिकाणांवरील भोंगे उतरवण्यात आले होते. १७ हजार ठिकाणांवरील आवाज कमी करण्यात आले होते. राज ठाकरे यांनी या निमित्तानं योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलं होतं. राज ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांचं कौतुक करताना महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्रातील सरकार सत्तेचं भोगी असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली आहे.

Share