राज्यात भूकंप होणार नाही; एकनाथ शिंदे निष्ठावंत शिवसैनिक – संजय राऊत

मुंबई : शिवसेनेचे महत्त्वाचे नेते एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन गेले आहे. ते काही गैरसमजातून गेले आहे. ते आमच्या संपर्कामध्ये आहे. एकनाथ शिंदे सुद्धा मुंबईच्या बाहेर आहे, पण त्यांच्याशी आमचा संपर्क झाला आहे. ज्या प्रकारे चित्र निर्माण केले जात आहे. त्यामध्ये काहीही तथ्य नाही, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

विधान परिषदेच्या निकालानंतर काही आमदारांचा संपर्क होत नाहीये हे सत्य आहे. काही आमदार मुंबईत नाहीत. पण आज सकाळपासून काही आमदारांचा संपर्क झालेला आहे. काही आमदारांना गैरसमजातून त्यांना बाहेर नेण्यात आले आहेत. एकनाथ शिंदे बाहेर असून त्यांच्यासोबत संपर्क झालेला आहे. जे चित्र निर्माण केले जात आहे त्यामध्ये शिवसेनेला कोणतेही तथ्य वाटत नाही. काही ठिकाणी संशयास्पद वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यमंत्र्यासोबत यासंदर्भात बैठक आहे, असे संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्रामध्ये राजस्थान आणि मध्य प्रदेश पॅटर्नप्रमाणे उद्धव ठाकरेंचे सरकार पाडावे अशा प्रकारची हालचाल गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे.  त्यांचे प्रयत्न सुरु आहेत पण हे महाराष्ट्रात चालणार नाही. या पद्धतीने तुम्हाला महाराष्ट्र अस्थिर करता येणार नाही. शिवसेनेवर घाव घालणे म्हणजे महाराष्ट्र दुबळा करणे. मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी कालच्या निकालानंतर मुंबईवर ताबा मिळवण्याची भाषा केली. यासाठी तुम्हीच फाटाफूट घडवून आणत आहात का? मुंबईवर विजय मिळवण्यासाठी शिवसेना दुबळी करण्याचे कारस्थान आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

दरम्यान शिवसेना ही निष्ठावंताची सेना आहे. सत्तेसाठी आणि पदासाठी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसणारी औलाद ही कधी शिवसेनेत निर्माण होणार नाही. जे निर्माण झाले आणि बाहेर पडले त्यांची अवस्था आपण पाहत आहात. ज्यांची नावे माध्यमातून पाहत आहे त्यातले बरेचशे आमदार वर्षा बंगल्यावर आहेत. काही मंत्र्यांशी संपर्क झाल्यावर त्यांनी आम्हाला इथे आणण्यात आल्याचे सांगितले आहे. ते आमदार गुजरात आणि सुरतमध्ये आहेत. त्यांची व्यवस्था गुजरात भाजपाचे अध्यक्ष करत आहे,असे संजय राऊत म्हणाले.

Share