‘यह तो झांकी है….मुंबई महापालिका अभी बाकी है…!’ मुंबई भाजपचे ट्विट

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे बहुमत गमावलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री सुप्रीम कोर्टाने बहुमत चाचणीसाठी स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. भाजपकडून सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला असून, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून उद्याच शपथ घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उद्धव ठाकरे सरकार कोसळल्यानंतर भाजपने आपला मोर्चा आता मुंबई महानगरपालिकेकडे वळवला आहे. मुंबई भाजपने ‘यह तो झांकी है….मुंबई महापालिका अभी बाकी है…!’ असे ट्विट करत शिवसेनेला इशारा दिला आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर भाजपने आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्याअनुषंगाने शिवसेनेला डिवचण्यासाठी मुंबई भाजपने एक ट्विट केले आहे. ”यह तो झांकी है…. मुंबई महापालिका अभी बाकी है…! असे या ट्विटमध्ये म्हटले केले आहे. या ट्विटसोबतच भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांचा हातात बॅट घेतलेला फोटोही शेअर करण्यात आला आहे. भाजप मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा सामना खेळायला तयार असून, या निवडणुकीत आम्हीच विजयी होणार, असा इशारा भाजपला शिवसेनेला द्यायचा असेल. त्या उद्देशाने भाजपकडून हे ट्विट करण्यात आल्याची चर्चा रंगली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वात श्रीमंत आणि मोठी महानगरपालिका आहे. मुंबई महापालिकेवर शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व आहे. मुंबई महानगरपालिका ही शिवसेनेची मोठी ताकद मानली जाते. येत्या काही दिवसांत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेसोबत भाजपनेही कंबर कसल्याचे दिसून येत आहे.

उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर भाजपच्या गोटात जल्लोष
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. त्यामुळे सध्या भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना पेढा भरवून आनंद व्यक्त केला. एकीकडे भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावारण आहे तर दुसरीकडे शिवसैनिकांकडून बंडखोर आमदारांचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर भाजपकडून सत्तास्थापनेचा दावा करण्यात येणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नवे सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने जोरदार हालचाली सुरू आहेत. देवेंद्र फडणवीस हे नवे मुख्यमंत्री म्हणून उद्याच शपथ घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Share