माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्‍यासह १२ नेत्‍यांना देश सोडून जाण्यास बंदी

कोलंबो : श्रीलंकेत सुरू असलेल्या आर्थिक संकटाच्या काळात माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे आणि यांच्‍यासह १२ अन्‍य नेत्‍यांना देश सोडून जाण्यास श्रीलंकेच्या न्यायालयाने बंदी घातली आहे.

श्रीलंकेत महिंदा राजपक्षे समर्थकांनी सरकारविरोधी निदर्शकांवर हल्ला केल्यानंतर देशात हिंसाचार उसळला आहे. आंदोलकांनी पंतप्रधानांच्या निवासस्थान ‘टेम्पल ट्री’मध्ये घुसून आग लावली. यानंतर माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी विशेष हेलिकॉप्टरने त्रिंकोमाली येथे जाऊन तेथील नौदल तळावर आश्रय घेतला आहे;परंतु या नौदल तळालाही आंदोलकांनी वेढले आहे.

भारतात पळून गेल्याची अफवा
महिंदा राजपक्षे यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते भारतात पळून गेल्याच्या अफवा मोठ्या प्रमाणात पसरल्या होत्या. त्यानंतर मंगळवारी श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्तांनी निवेदन जारी करत हे वृत्त फेटाळून लावले आहे. काही राजकीय व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबीय भारतात पळून गेल्याच्या सोशल मीडियावर आणि प्रसारमाध्यमांमध्ये अफवा पसरल्या जात आहे. मात्र, हे पूर्णपणे खोटे असल्याचे त्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे.

महिंदा राजपक्षेंच्या अटकेसाठी तक्रार
श्रीलंकेतील वकिलांच्या एका गटाने महिंदा राजपक्षे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अटक करण्यासाठी पोलिस मुख्यालयात तक्रार दाखल केली आहे. दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत महिंदा राजपक्षे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लोकांना सरकारविरोधी निदर्शने करणाऱ्यांवर हल्ले करण्यास प्रवृत्त केल्याचे नमूद करण्यात आले आहे.

राष्‍ट्रपती गोटबाया यांनी शांततेसाठी सुचवले चार पर्याय

दरम्‍यान, आर्थिक रसातळाला गेलेल्‍या श्रीलंकेमधील तणाव महिंदा राजपक्षे यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्‍यानंतरही कायम आहे. आता राष्‍ट्रपती गोटबाया राजपक्षे यांनी राजीनामा देण्‍यास नकार दिला आहे. राष्‍ट्रपती गोटबाया यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन करत विरोधी पक्षांबरोबर चर्चा करणार असल्‍याचे ट्‍विटरच्‍या माध्‍यमातून स्‍पष्‍ट केले आहे.

राष्‍ट्रपती गोटबाया यांनी चार ट्‍विट करत देशात अशांती संपविण्‍यासाठी पर्याय सुचवले आहेत. त्‍यांनी म्‍हटले आहे की, देशात नवीन सरकार स्‍थापन करण्‍यासाठी सर्वांनी प्रयत्‍न करण्‍याची गरज आहे. सरकार स्‍थापन झाल्‍यास देश अराजकतेच्‍या गर्तेत जाणार नाही. भविष्‍यातील रणनीती ठरविण्‍यासाठी ठोस उपाययोजना करणे शक्‍य होईल. त्‍याचबरोबर पंतप्रधानही नियुक्‍त केले जातील.

नवीन सरकारला देशाच्‍या पुढील वाटचालीसाठी नवीन योजना आखण्‍यासाठी वेळ दिला जाईल. घटनादुरुस्‍ती करून देशाला आणखी मजबूत केले जाईल. विरोधी पक्षांच्‍या मागणीनुसार लवकर विरोधी पक्षांबरोबर बैठक घेतली जाईल. सर्वसामान्‍य नागरिकांच्‍या मालमत्ता वाचविण्‍यासाठी आणि देशाला वाचविण्‍यासाठी जीवनावश्‍यक वस्‍तूंचा पुरवठा होणे गरजेचे आहे. देशाची अर्थव्‍यवस्‍था पूर्वपदावर आणण्‍यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे, असेही त्‍यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Share