उद्धव ठाकरेंच्या पत्राने शंभर हत्तींचं बळ मिळालं – आमदार राहुल पाटील

परभणी : शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पत्राच्या माध्यमातून दिलेल्या कौतुकाच्या थापेमुळे आपणास शंभर हत्तीचं बळ प्राप्त झालं आहे, अशी भावना शिवसेना आमदार राहुल पाटील यांनी व्यक्त केली.

आमदार राहूल पाटील यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हणतात, शिवसेना आपला परिवार आहेच. या परिवाराला कुणाची तरी अघोरी दृष्ट लागली आणि आपण आम्हा सर्वांच्या डोळ्यासमोर मुख्यमंत्रीपद स्वाभिमानाने सोडलंत. वर्षा बंगला सोडताना आमच्या डोळ्यांत पाणी मावत नव्हतं. आपण मात्र छातीचा कोट करून तिथे उभा होता. जनतेचं, तमाम शिवसैनिकांचं प्रेम स्वीकारत अभिवादन करत होतात.

शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या तेजस्वी विचारांची ढाल म्हणजे शिवसेना आहे. आमच्या उमेदीच्या वयातच आम्ही या विचारांनी तेजाळून गेलो. आता आणखी कुठली अपेक्षा नाही. शिवसेनेशी निष्ठा हेच आमचं सर्वस्व! ही लढाई लढताना स्वतःची काळजी घ्याल, ही कळकळीची विनंती. परभणी जिल्ह्यातील तमाम शिवसैनिक या लढाईत आपल्या समवेत उभे आहेत, असेही आमदार राहुल पाटील यांनी सांगितले.

उद्धव ठाकरेंनी पत्रात काय म्हटलं होतं?

जय महाराष्ट्र !

शिवसेना हा आपला परिवार आहे. आजही वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच आपले सर्वस्व आहे. निष्ठा व अस्मितेची महती हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांनीच आपल्याला शिकवली. आईच्या दुधाशी बेईमानी करु नका हा त्यांचा निष्ठेबाबतचा मंत्र आजही सगळ्यांना सन्माननीय. शिवसेनेचे आमदार म्हणून आपण त्या निष्ठेचे पालन केलेत व वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे पाईक असल्याचे दाखवून दिलेत. कोणत्याही धमक्या वा प्रलोभनाला बळी न पडता आपण निष्ठेने शिवसेनेसोबत राहिलात, आपल्या या भूमिकेमुळे महाराष्ट्राला अभिमान वाटला व शिवसेनेस बळ मिळाले.

आई जगदंबा आपणांस निरोगी उदंड आयुष्य देवो.

आपला नम्र

उद्धव बाळासाहेब ठाकरे

Share