औरंगाबादमध्ये पाणी प्रश्न गंभीर, महिलांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून शहरातल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनत चालला आहे. काही दिवसांपूर्वी चिस्तिया चौकात सिडको परिसरातील नागरिकांनी पाण्यासाठी तीव्र निदर्शने केली होती. याची मनपा आयुक्तांनी वेळीच दखल न घेतल्याने संतापलेल्या नागरिकांनी थेट मनपा आयुक्तांच्याच घरी धडक देत घोषणाबाजी केली होती. हे प्रकरण ताजे असतानाच आता शहरातील पुंडलीकनगर, हनुमाननगर भागातील नागरिकांनीही पाण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढत शोले स्टाईल आंदोलन केले आहे.

आज सकाळी सहा वाजता शहरातील पुंडलिकनगर जलकुंभावर महिलांनी धडक देत आंदोलन सुरू केलं आहे. कमी दाबाने येणारे पाणी त्यातही दूषित पाणी यामुळे संतापलेल्या महिलांनी जलकुंभावर धडक दिली आणि ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. पाणी पुरवठा व्यवस्थित होत नसल्याने पुंडलिकनगर भागातील महिलांनी पाण्याच्या टाकीवर धाव घेतली. मात्र, यावेळी आतमध्ये जाण्यासाठी कुलुप लावलेले होते. त्यामुळे संतप महिलांनी दगडाने ठोकून कुलुप तोडले आणि त्यानंतर जलकुंभाच्या परीसरात जाऊन ठिय्या आंदोलन सुरू केले. इतकंच नाहीतर काही नागरिक पाण्याच्या टाकीवरती जाऊन घोषणाबाजी करताना पाहायला मिळाले. त्यामुळे शहरातील पाणी प्रश्न आता गंभीर बनत चालला असल्याचे पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे.

 

Share