दीड वर्षांत १० लाख नोकऱ्या देणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

नवी दिल्ली : येत्या दीड वर्षात मिळणार १० लाख सरकारी नोकऱ्या देण्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. आगामी दीड वर्षात केंद्र सरकारच्या सर्व विभागांमध्ये १० लाख पदांची भरती करण्यात येणार आहे. सरकारच्या विविध खात्यांमध्ये आणि मंत्रालयांमध्ये ही नोकर भरती करण्यात येणार आहे. मिशन मोडवर हे काम करून १० लाख लोकांची भरती करावी, असे आदेशही पंतप्रधान मोदी यांनी दिले आहेत.

मंगळवारी सकाळी पीएमओ कार्यालयाकडून ट्विट करण्यात आले आहे. या ट्विटमध्ये ही घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व विभाग आणि मंत्रालयांमधील मानव संसाधन स्थितीचा आढावा घेतला आणि सरकारने पुढील १.५ वर्षांत मिशन मोडमध्ये १० लाख लोकांची भरती करावी, असे निर्देश दिले, असे या ट्विटमध्ये नमूद करण्यात आले आहे.

बेरोजगारीच्या मुद्द्यावर अनेकदा विरोधकांच्या टीकेला सामोरे जाणारे मोदी सरकार आता या संकटावर मात करण्यासाठी योजना तयार करत आहे. गेल्या काही दिवसांत पाटणा, अलाहाबादसारख्या शहरांमध्ये तरुणांनी रेल्वे भरतीसाठी निदर्शने केली आहेत. बेरोजगारीच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष सातत्याने मोदी सरकारवर टीका करत असतात. काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांच्यासह इतर पक्षाचे नेतेही मोदींवर हल्लाबोल करत असतात. विशेषत: नोटाबंदी, जीएसटी आणि नंतर कोरोना या काळात अर्थव्यवस्थेचा विकास दर मंदावल्यामुळे खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांच्या संधी फारशा आलेल्या नाहीत. नोटाबंदी आणि नंतर कोरोनाच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अशा परिस्थितीत मोदी सरकारची ही घोषणा सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी दिलासादायक ठरणार आहे.

काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांची टीका
पीएमओ कार्यालयाकडून नोकऱ्यांसंदर्भात करण्यात आलेल्या ट्विटवर काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत या निर्णयाबाबत प्रतिक्रिया देत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. याला म्हणतात, ९०० चुहे खाकर बिल्ली हज को चली. मागील ५० वर्षांचा हिशेब केल्यास बेरोजगारीचा दर वाढला आहे. रुपयाची किंमत ७५ वर्षांत घसरली आहे आणि इथे पंतप्रधान ट्विटर-ट्विटर खेळून महत्त्वाच्या मुद्द्यांवरून लक्ष भरकटवण्याचे काम करत आहेत, अशी टीका सुरजेवाला यांनी केली. रणदीप सुरजेवाला यांनी याबाबत ट्विटही केले आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले होते की, १ मार्च २०२० पर्यंत केंद्र सरकारच्या विभागांमध्ये ८.७२ लाख पदे रिक्त आहेत. त्यामुळे सध्या हा आकडा १० लाखांच्या जवळ गेला असेल. हे लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोकर भरतीचे आदेश दिले आहेत. जितेंद्र सिंह यांनी म्हटले होते की, केंद्र सरकारच्या सर्व विभागांमध्ये एकूण ४० लाख ४ हजार पदे आहेत, त्यापैकी सुमारे ३१ लाख ३२ हजार कर्मचारी नियुक्त आहेत. अशा प्रकारे ८.७२ लाख पदांची भरती करण्याची गरज आहे. २०१६-१७ ते २०२०-२१ या कालावधीत एसएससीमध्ये एकूण २,१४,६०१ कर्मचाऱ्यांची भरती झाल्याचे जितेंद्र सिंह यांनी सांगितले होते. याशिवाय आरआरबीने २,०४,९४५ लोकांना नियुक्ती दिली आहे, तर युपीएसीने २५,२६७ उमेदवारांची निवड केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली होती.

Share