संजय राऊतांची होणार सुटका? जामीन अर्जावर आज सुनावणी

मुंबई : पत्राचाळ गैरव्यवहारा प्रकरणी ईडीच्या ताब्यात असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांची आज न्यायालयीन कोठडी संपत आहे. त्यामुळे ईडीकडून आज राऊतांना मुंबई सत्र न्यायालयात हजर केलं जाणार आहे. राऊतांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होईल. त्यामुळे राऊतांना बेल मिळणार की पुन्हा जेलमध्ये जावं लागणार याबाबत आज निर्णय होईल.

खासदार संजय राऊत यांना गोरेगाव पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ३१ जुलै रोजी ईडीने अटक केली. त्यांना प्रथम ईडी कोठडी सुनावण्यात आली. तर, ८ ऑगस्टला त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तेव्हापासून खा. संजय राऊत आर्थर रोड कारागृहात आहेत.

काय आहे पत्राचाळ घोटाळा?
मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचं काम देण्यात आलं होतं. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे तीन हजार फ्लॅट बांधकाम करायचं होतं, त्यापैकी ६७२ फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती. परंतु, २०१० मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे २५८ टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर २०११ , २०१२ आणि २०१३ मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले. पत्राचाळ जमीन घोटाळा हा १,०३४ कोटी रुपयांचा असल्याचा संशय ईडीला आहे.

Share