सरकार शेतकऱ्यांना ‘गोगलगायी’च्या गतीनेच मदत देणार का ?

लातूर : गोगलगायींचा प्रादुर्भाव, अतिवृष्टी, संततधार पाऊस या एकामागून एक आलेल्या संकटांमुळे यंदा राज्यासह लातूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकारने आर्थिक मदत जाहीर केली. पण, ती अद्याप शेतकरी बांधवांना मिळाली नाही. त्यामुळं लातूर ग्रामीणचे काँग्रेसचे आमदार धिरज देशमुख यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. सरकार शेतकऱ्यांना ‘गोगलगायी’च्या गतीनेच मदत देणार का? असा सवाल त्यांनी केला आहे.

खरीप हंगामातील पेरण्या झाल्यानंतर संततधार पाऊस झाला. त्यामुळे सुरवातीलाच मोठे नुकसान झाले. त्यातच गोगलगायीचा प्रादुर्भाव सुरू झाला. गोगलगायीनी सोयाबीनसह इतर पिके फस्त केली. त्यामुळे अनेक शेतक-यांना दुबार तर काहींना तिबार पेरण्या कराव्या लागल्या. हे संकट संपते न संपते तोच येलो मोझॅक रोगाने डोके वर काढले आणि अतिवृष्टीही सुरू झाली. त्यामुळे पिकांचे नुकसान होऊन शेतक-यांना मोठा आर्थिक फटका बसला.

याबाबत लातूरचे माजी पालकमंत्री अमित देशमुख, आमदार धिरज देशमुख यांनी वेळोवेळी राज्य सरकारकडे प्रश्न उपस्थित केले. पावसाळी अधिवेशनातही महविकास आघाडीतील नेत्यांनी आंदोलन करून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. याची दखल घेत राज्य सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर केली. पण, ती सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्याना सरसकट जाहीर केली नसल्याने ग्रामीण भागात संभ्रमावस्था वाढली आहे.

सरकारने जाहीर केलेली मदत अद्याप शेतकरी बांधवांना मिळाली नाही. दसरा, ईद, दिवाळी हे सण जवळ आले आहेत. या सणांची तयारी नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना करता यावी, त्यांच्या घरात आनंदाची पणती प्रज्वलीत व्हावी म्हणून तरी सरकारने लवकर पावले उचलणे अपेक्षित असल्याचे धिरज देशमुख यांनी म्हटलं आहे.

Share