तुम्ही या, आमची पूर्ण तयारी : संजय राऊतांचे एकनाथ शिंदेंना जाहीर आव्हान

मुंबई : ज्यांना आमचा सामना करायचा आहे त्यांनी मुंबईत यावे. आम्ही सभागृहात जिंकू, जर रस्त्यावर लढाई झाली तरी तिथेही आम्हीच जिंकू. हम हार नही मानेंगे, हम जितेंगे, असा निर्धार करीत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी बंडखोर सेना नेते एकनाथ शिंदे यांना जाहीर आव्हान दिले आहे.

आज शुक्रवारी (२४ जून) मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, शिवसेना नेते अनिल देसाई आणि संजय राऊत यांची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील राजकीय घडामोडींबाबत चर्चा करण्यात आली तसेच शिंदे गटाला रोखण्यासाठी पुढील रणनीतीबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तुम्ही या, आमची पूर्ण तयारी आहे असे थेट आव्हान बंडखोर शिंदे गटाला दिले आहे. फक्त कायदेशीर मार्ग नाही, तर सर्व प्रकारचे मार्ग अवलंबवणार. मी तुम्हाला यशवंतराव चव्हाण यांच्या साक्षीने आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला वंदन करून सांगतो, हम हार नही मानेंगे, आता आमची वेळ आहे, अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिंदे गटाला ओपन चॅलेंज दिले आहे.

त्यांनी अत्यंत चुकीचा निर्णय घेतला आहे. त्यांना आम्ही संधी दिली होती. मात्र, आता वेळ निघून गेली आहे. त्यामुळे आम्ही आता लढायला तयार आहोत. आम्हाला हार मान्य नाही. आम्हीच जिंकणार, असे संजय राऊत म्हणाले. याच इमारतीमधून महाविकास आघाडीची घोषणा झाली. याच इमारतीत महायुतीचे बंधन बांधण्यात आले. आता याच इमारतीमधून मी सांगत आहे की, महाविकास आघाडी मजबूत आहे. हे सरकार पुढील अडीच वर्ष पूर्ण करेल आणि पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. आम्हाला जे करायचे ते आम्ही आता केले आहे. शरद पवार हे देशाच्या राजकारणातील सगळ्यात मोठे नेते आहेत. त्यांचा आणि मुख्यमंत्र्यांचा संवाद सुरू असल्याचेही राऊतांनी सांगितले.

दिलीप वळसे पाटील यांना का बोलावण्यात आले होते, असे विचारण्यात आले असता राऊट यांनी सांगितले की, दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आहेत. ते अनुभवी नेते असून, विधानसभा अध्यक्षही राहिले आहेत. त्यांच्यात आणि अनिल देसाई यांच्यात कायदेशीर लढाईसंबंधी चर्चा झाली. जे आम्हाला करायचे आहे ते आम्ही केले आहे.

Share