६२ तालुक्यांतील २७१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजले; ४ ऑगस्टला मतदान

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने पावसाचे प्रमाण कमी असलेल्या विविध ६२ तालुक्यांतील २७१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर केला आहे. त्यानुसार येत्या ४ ऑगस्टला मतदान होणार असून, ५ ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने या २७१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यानुसार संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.

एकीकडे राज्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालेले असताना आता ६२ तालुक्यांतील २७१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे गावपातळीवर प्रचाराचा धुरळा उडणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या १७ मे २०२२ रोजीच्या आदेशानुसार पावसामुळे निवडणूक कार्यक्रम बाधित होण्याची शक्यता कमी असलेले ६२ तालुके निवडून तेथील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार संबंधित तहसीलदार ५ जुलै २०२२ रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्रे १२ ते १९ जुलै २०२२ या कालावधीत दाखल करण्यात येतील. शासकीय सुट्टीमुळे १६ आणि १७ जुलै रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत. उमेदवारी अर्जाची छाननी २० जुलै रोजी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत २२ जुलै रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल. मतदान ४ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. मतमोजणी ५ ऑगस्ट २०२२ रोजी होईल.

निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची तालुकानिहाय संख्या

नाशिक जिल्हा : बागलाण-१३, निफाड-१, सिन्नर-२, येवला-४, चांदवड-१, देवळा-१३, आणि नांदगाव-६.
पुणे जिल्हा : हवेली-५, शिरुर-६, बारामती-२, इंदापूर-४, पुरंदर-२
धुळे जिल्हा : धुळे-२, साक्री-४९, शिंदखेडा-१
जळगाव जिल्हा : रावेर-१२, अमळनेर-१, एरंडोल-२, पारोळा-३, चाळीसगाव-६
अहमदनगर जिल्हा : अहमदनगर-३, श्रीगोंदा-२, कर्जत-३, शेवगाव-१, राहुरी-३, संगमनेर-३
औरंगाबाद जिल्हा : औरंगाबाद-१, पैठण-७, गंगापूर-२, वैजापूर-२, सिल्लोड-३, खुलताबाद-१
जालना जिल्हा : जालना-६, परतूर-१, बदनापूर-१९, मंठा-२
बीड जिल्हा : बीड-३, गेवराई-५, अंबाजोगाई-५
लातूर जिल्हा : रेणापूर-४, देवणी-१, शिरूर अनंतपाळ-४
उस्मानाबाद जिल्हा : तुळजापूर-२, कळंब-१, उमरगा-५, लोहारा-२, वाशी-१
सोलापूर जिल्हा : सोलापूर-२, बार्शी-२, अक्कलकोट-३, मोहोळ-१, माढा-२, करमाळा-८, पंढरपूर-२, माळशिरस-१, मंगळवेढा-४
सातारा जिल्हा : कराड-९ आणि फलटण-१
सांगली जिल्हा : तासगाव-१
परभणी जिल्हा : सेलू-३
बुलडाणा जिल्हा : खामगाव-२ आणि मलकापूर-३

एकूण-२७१.

Share