आम्ही भाजपला सोडलेय, हिंदुत्व नाही -उद्धव ठाकरे

कोल्हापूर : आम्ही भाजपला सोडले आहे, हिंदुत्व सोडले नाही. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही. भाजपने हिंदुत्वाचा ठेका घेतला नाही. विरोधकांवर खोटेनाटे आरोप करून आपले घोडे पुढे सरकतेय का हे बघायचे, अशी भाजपची सवय झाली आहे, असे शाब्दिक हल्ले करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघाती टीका केली.
उत्तर कोल्हापूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील काँग्रेस उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जाहीर सभा घेतली. या मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारासाठी काल भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आले होते तेव्हा त्यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला होता. या टीकेला मुख्यमंत्र्यांनी आज प्रत्युत्तर दिले. यावेळी भाजपवर सडकून टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही कमी पडलो तरी चालेल; पण खोटे बोलणार नाही. आमच्या महाविकास आघाडीवर टीका करणाऱ्यांना मला विचारायचे आहे की, युती असतानाही भाजपची मते शिवसेनेला का मिळाली नाहीत ? २०१९ मध्ये भाजपने काँग्रेसला कोल्हापुरात छुपी मदत केली होती की नाही? भाजपसारखी आम्ही छुपी युती करत नाही. शिवसेना स्थापन झाल्यापासून शिवसेनेने कधीही झेंडा, रंग, विचार, नेता बदलला नाही. तुम्ही मात्र लालकृष्ण अडवाणी, अटलबिहारी वाजपेयी यांना विसरले. कुठेही त्यांचा फोटो दिसत नाही. फक्त नरेंद्र मोदी यांचा फोटो दिसतो. लोकसभेची निवडणूक असो किंवा सरपंचपदाची प्रत्येक ठिकाणी नरेंद्र मोदींचाच चेहरा दिसतो. मोदी हे पंतप्रधान आहेत की गावचे सरपंच, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला हाणला.


महाविकास आघाडी सरकारने कोल्हापूरकरांसाठी केलेल्या कामांचा पाढा वाचला. ते म्हणाले, कोल्हापूर हा भगव्याचा बालेकिल्ला आहे आणि यापुढेही राहील. पंचगंगा, रंकाळ्यासाठी आम्ही भरीव काम करतो आहोत. विरोधकांकडे बोलायला मुद्दे नाहीत. त्यांना धार्मिक मुद्दा पुढे करायचा आहे. खोटे बोलेन पण रेटून बोलेन, अशी विरोधकांची निती आहे. आम्ही शिवरायांचे मर्द मावळे आहोत. खोटे बोलणे आमच्या रक्तात नाही. जनतेसाठी जे केले ते ठासून सांगू, जे केले नाही त्यात कमी पडलो म्हणून सांगू, पण खोटे बोलणार नाही. पंचगंगा नावाप्रमाणे स्वच्छ असली पाहिजे, प्रेतं टाकलेल्या गंगेसारखी नको, असे सांगताना गंगा नदीत कोव्हिड काळात मृतदेह पडले होते, असा टोला त्यांनी भाजपला लगावला. भाजपला काही प्रश्न विचारायचे असतील तर जनतेच्या साक्षीने मला विचारू द्या. आमच्या कामात कुठं खोटं असेल तर जनतेसमोर आमचा पर्दाफाश करू देत, असे आव्हान मुख्यमंत्र्यांनी भाजपला दिले.
भाजप नेते जर कुस्ती खेळण्यासाठी मैदानात उतरले तर ते आधी पैलवानांच्या घरी धाडी टाकतील, कारण समोरून वार करण्याची हिंमत त्यांच्यात नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर होत असलेल्या कारवाईवरून भाजपला चिमटा काढला. भाजप नेते नेहमी भगव्याचे रक्षण करण्यासाठी मैदानात उतरल्याचे सांगतात. मात्र, कोणता भगवा? खरा भगवा शिवसेनेचा आहे. तुमचा भगवा खरा भगवा नाही. हिंदुसम्राट म्हटले की, फक्त बाळासाहेब ठाकरे आठवतात. देशात एकाला भाजपने हिंदुहृदयसम्राट करण्याचा प्रयत्न केला. हिंदुहृदयसम्राटांबद्दल प्रेम असेल तर मग अमित शहांनी दिलेला शब्द का मोडलात? नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचे नाव देण्यास भाजपचा विरोध का? असा सवालही ठाकरे यांनी विचारला.

Share