औरंगाबादकरांनो आता एका क्लिकवर कळणार कोणत्या दिवशी आणि कधी येणार पाणी

औरंगाबाद : औरंगाबादकरांना सध्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी महापालिकेतर्फे विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.  नागरिकांना आता एका क्लिकवर पाणीपुरवठ्याचा दिवस आणि वेळ कळणार आहे. पाणीपुरवठ्याविषयी काही समस्या असेल, तर नागरिकांना एका क्लिकवर आपली समस्या नोंदवता येणार आहे. यासाठी महापालिकेकडून ‘जल बेल अॅप’ची निर्मिती केली जात आहे. ‘स्मार्ट सिटी’चे या कामाला सहकार्य मिळत आहे.

औरंगाबादमध्ये सध्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर बनत चालला आहे. त्यात ‘एमआयडीसी’कडून तीन एमएलडी पाणी घेऊन सिडको भागातील टँकर या पाण्यातून भरले जात आहेत. हर्सूल तलावापासून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत नवीन जलवाहिनी टाकून दहा एमएलडी पाणी वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाणीपुरवठा व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी झोननिहाय पालक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. ‘एमजेपी’च्या काही सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने महापालिकेच्या सेवेत घेण्यात आले आहे. मुख्य जलवाहिनीवरील गळत्या बंद करण्याचे कामदेखील केले जात आहे. ही कामे सुरू असतानाच महापालिकेने स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या मदतीने ‘जल बेल अॅप’ तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. लवकरच हे अॅप नागरिकांच्या सेवेत दाखल होईल अशी माहिती देण्यात आली आहे. या अॅपमुळे पाणी केव्हा येणार, पाणी येणार की नाही येणार, पाण्याची वेळ काय आहे, पाणी किती वेळ सुरू राहणार, पाणी येणार नसेल तर ते का येणार नाही, त्यामधील नेमकी समस्या काय आहे, पाणी समस्येबद्दल तक्रार कुठे करावी या सर्व गोष्टी जल बेल अॅपद्वारे नागरिकांना समजणार आहे.

Share