उत्तर कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव विजयी

कोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या उत्तर कोल्हापूर विधानसभा मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी आणि काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी १८ हजार ९०१ मतांनी विजय मिळवला आहे. या विजयामुळे कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या पहिल्या महिला आमदार होण्याचा मान जयश्री जाधव यांना मिळाला आहे. या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम पराभूत झाले आहेत.

काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना मतदारांनी विजयी केले आहे. या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी (१२ एप्रिल) ६१.१९ टक्के मतदान झाले होते. एकूण २ लाख ९१ हजार ९७८ मतदारांपैकी १ लाख ७८ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आज शनिवारी या निवडणुकीची मतमोजणी कोल्हापूर येथील राजाराम तलाव परिसरातील शासकीय गोदामात झाली. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरूवात झाली. २६ टेबलांवर मतमोजणीच्या २६ फेऱ्या झाल्या. यात अगदी पोस्टल मतांच्या फेरीपासूनच जयश्री जाधव यांनी मतांची आघाडी घेतली होती आणि जाधव यांनी शेवटपर्यंत ही आघाडी कायम ठेवत विजयावर शिक्कामोर्तब केले. काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना ९६ हजार २२६ मते मिळाली, तर भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम यांना ७७ हजार ४२६ इतकी मते मिळाली आहेत.

काँग्रेसचे नेते, गृह राज्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या आणि आरोप-प्रत्यारोपांच्या तोफांनी राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतलेल्या या निवडणुकीत जयश्री जाधव यांच्या विजयाने काँग्रेसने कोल्हापूर उत्तरचा गड आपल्याकडे राखला आहे. या निवडणुकीकडे काँग्रेसचे नेते, पालकमंत्री सतेज पाटील विरुद्ध भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील असेच पाहिले गेले होते. जाधव यांच्या विजयामुळे सतेज पाटील यांची सरशी झाली आहे, तर होम टर्फवरच भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम यांचा पराभव झाल्याने चंद्रकांत पाटील यांची मात्र पिछेहाट झाली आहे. सत्यजीत कदम हे माजी खासदार आणि भाजप नेते धनंजय महाडिक यांचे नातलग आहेत. त्यामुळे महाडिक गट पूर्ण शक्तीने या निवडणुकीत उतरला होता. कदम यांच्या पराभवामुळे महाडिक गटाला मोठा धक्का बसला आहे.

जयश्री जाधव सुरुवातीपासून आघाडीवर

पालकमंत्री सतेज पाटील यांच्या कसबा बावडा भागातून मतमोजणी सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव २१३७ मतांनी आघाडीवर होत्या. जयश्री जाधव यांना ४८५६ तर भाजपचे सत्यजीत कदम यांना २७१९ मते मिळाली. दुसऱ्या फेरीत जयश्री जाधव यांना ५५१५ तर सत्यजीत कदम यांना २५१३ मते मिळाली, तर तिसऱ्या फेरीमध्ये जाधव यांना ४९२८ तर कदम यांना २५६६ मते मिळाली. तिन्ही फेऱ्यानंतर जयश्री जाधव या ७५०१ मतांनी आघाडीवर होत्या. चौथ्या फेरीनंतर जाधव यांना ३७०९ तर कदम यांना ३९३७ मते मिळाली. पाचव्या फेरीनंतर कदमवाडी, जाधववाडी, भोसले वाडी या भागातून सत्यजित कदम यांनी आघाडी घेत ४१९८ मते मिळवली. मात्र, पुन्हा सहाव्या फेरीमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसने आघाडी घेतली. सहाव्या फेरीत जाधव यांनी ४६८९ तर कदम यांनी २९७२ मते मिळवली. दहाव्या फेरीमध्ये जाधव यांना २८६८ तर कदम यांना ३७९४ मते मिळाली. अकराव्या फेरीत जाधव यांना २८७० तर कदम यांना २७५६ मते मिळाली. २० व्या फेरीनंतर जाधव यांनी १५ हजार मतांची मोठी आघाडी घेतली होती. संभाजी नगर, पद्माला, मंगळवार पेठ या भागातील मतपेट्या उघडल्यानंतर जयश्री जाधव यांना ४३६६ तर सत्यजीत कदम यांना ३०७४ मते मिळाली. दरम्यान, चोविसाव्या फेरीअखेर जयश्री जाधव यांना १८ हजार ८३८ इतके मताधिक्य मिळाले होते. त्यानंतर जयश्री जाधव यांनी १९ हजार मतांची आघाडी घेत विजय मिळवला आहे.

हा विजय कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेचा -जयश्री जाधव

कोल्हापूरच्या जनतेने शब्द पाळला आहे. चंद्रकांत जाधव (अण्णा) यांच्यानंतर माझी जी जबाबदारी घेतली होती ती पूर्ण केली आहे. कोल्हापूरच्या जनतेने आपला स्वाभिमान राखला आहे. महाविकास आघाडीतल्या सर्व नेत्यांनी मला सहकार्य केले. हा विजय माझ्या कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेचा आहे. चंद्रकांत जाधव यांनी जे पेरले तेच उगवले. मताधिक्य मिळणार याची अपेक्षा होती कारण जनता आमच्यासोबत होती, अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या विजयी उमेदवार जयश्री जाधव यांनी निकालानंतर दिली. माध्यमांशी बोलताना त्या भावुक झाल्या होत्या. कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेने अखेर करून दाखवले. त्यांनी मला पाठिंबा दिला. अण्णांनी जे पेरलं ते चांगलं उगवलं. अण्णा नाहीत याची मला खंत आहे. त्यांची मला पावलोपावली आठवण येईल. अण्णांच्या माघारी कोल्हापूर जनतेने त्यांचे स्वप्न पूर्ण केले, असे सांगत, अण्णांनी जी माणसे जोडली ती आजही माझ्याबरोबर आहेत. अण्णांचे स्वप्न मी निश्चित पूर्ण करेन. या निवडणुकीत भाजपचे संस्कार कमी पडले, असेही त्या म्हणाल्या.

Share