डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीवरील कोरोना सावट हटले

मुंबई : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानवाची जयंती यंदा कोरोनाचे सावट कमी झाले आहे. त्यामुळेआरोग्याच्या नियमांचे पालन करून हा जयंती उत्सव आपण उत्साहाने साजरा करूयात. यासंदर्भात आवश्यक ते परिपत्रक गृह विभागाच्या वतीने  लवकरच प्रसिद्ध  करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत सांगितले. महापरिनिर्वाण दिनाप्रमाणेच १४ एप्रिल रोजी राज्य शासनामार्फत हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यास गृहमंत्री दिलीप वळसे -पाटील यांनी मान्यता दिली व त्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल रोजी रोजी होणाऱ्या १३१ व्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या तयारीसंदर्भात आज सहयाद्री अतिथीगृह आयोजित बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरदृश्यप्रणालीव्दारे उपस्थित होते त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री उद्वव ठाकरे म्हणाले की, गेली दोन वर्षे डाॅ. बाबासाहेंबाची जयंती उत्सव व पुण्यतिथीनिमित्त अभिवादन अशा दोन्हीही कार्यक्रमात आपण कोरोना निर्बंधांमुळे अतिशय संयम पाळला आणि नियमांचे काटेकोर पालन केले ही खरोखरच खूप मोठी गोष्ट आहे. आता हे कोरोनाचे सावट कमी झाले आहे आणि या महामानवाची जयंती आपणा सर्वांना उत्साहाने साजरी करायची आहे.महानगरपालिका आणि पोलीस यांनी नेहमीप्रमाणे संपूर्ण नियोजन व तयारी केली आहे. राज्यभरात देखील उत्साहाने तसेच आरोग्याचे नियम पाळून हा उत्सव साजरा करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

चैत्यभूमी येथे हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येणार : गृहमंत्री  
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, नियमांचे पालन करूनच जयंती साजरी करावी लागेल. त्या अनुषंगाने मुंबई महापालिका आणि राज्य शासनाच्या वतीने सर्व उपाययोजना करण्यात येतील. राज्य शासनाच्या वतीने १४ एप्रिल बाबतच्या मार्गदर्शक सूचना आगामी चार दिवसात प्रसिद्ध करण्यात येतील. महापरिनिर्वाण दिनाप्रमाणे जयंती दिनी राज्य शासनाच्या वतीने चैत्याभूमी येथे हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टीच्या मागणी यावेळी मान्य करण्यात आली आहे.

Share